वारीच्या वाटेवर हरित संदेश! श्री संत वासुदेव महाराज पायदळ वारीत गावोगावी वृक्षारोपण; अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम!!

बातमी शेअर करा.

अकोला :-श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेतर्फे आयोजित श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदळ वारीत यंदा भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला जात आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त अनिल कोरपे यांच्या संकल्पनेतून वारी मार्गावरील प्रत्येक गावात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, हा उपक्रम महाराष्ट्रातील वारी परंपरेत एक आगळावेगळा आदर्श ठरत आहे.आज श्रीक्षेत्र तिधारा (जि. हिंगोली) येथे स्थानिक तरुणांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत युवकांना निसर्गसंवर्धनाची प्रेरणा देण्यात आली.
वारीच्या मार्गावरील प्रत्येक गावात किमान पाच वृक्षांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही स्थानिक नागरिकांकडे सोपविण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या अभंगातील विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार होत आहेत.
अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून समाजपरिवर्तन घडविण्याचा संदेश संतांनी दिला आहे. त्याच विचारधारेचा स्वीकार करत श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था भक्ती, सेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवत आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणारे हे हरित अभियान पंढरपूरपर्यंत अखंड सुरू राहणार असून, प्रत्येक गावात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमामागील प्रमुख प्रेरणास्थान असलेले ‘पाणीदार माणूस’ अनिल कोरपे यांनी वृक्षारोपणाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले आहे. त्यांच्या पर्यावरणप्रेमी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही त्यांच्या हातून अशीच समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक सेवा घडत राहो, अशी भावना वारकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. इतरही वारकरी मंडळांनी अशा प्रकारचा उपक्रम राबवल्यास पर्यावरणावर हातभार लागू शकतो.

गजानन कुसुम ओंकार हरणे-मो. ९८२२९४२६२३.जिल्हा परिषद नगर, खडकी, अकोला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *