
श्रीयुत जनार्दन महाराजांच्या दिंडी बरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली.त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या.त्यांनी सांगितले,”वारीमुळे आळंदीपासुनचा पाच-सहा किलोमीटर चा रस्ता वाहनांसाठी बंद असतो. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी चालावे लागणार आहे. म्हणून आपण लवकर निघु.तुम्ही बरोबर पहाटे पाच वाजता सारसबागेच्या दारात या”..आदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले.बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ मधून घरी आला होता. त्याला इमर्जन्सी आली म्हणून जावं लागलं होतं.
तिच्या सुनेने डॉक्टर दीप्तीने आम्हाला सोडायचे ठरवले. पहाटे साडेचार वाजता आम्ही गाडीने निघालो.थोडा पाऊस पडून गेला होता.रस्त्यावर निरव शांतता होती. रस्ता एकदम सुनसान होता….अगदी कोणी सुद्धा नव्हतं. सारसबागेजवळ तिने आम्हाला सोडले.परत जाताना दिप्ती एकटी कशी जाईल याची मला चिंता वाटली.पण बहीण अत्यंत विश्वासाने म्हणाली, “अगं पंढरीराया तिला नेईल सुखरूप घरी .काळजी नको करूस.”
अरे खरचं की… एकदा का त्याच्यावर सोपवलं की मग सोपच होतं… मन निर्धास्त झालं…
तिथे ट्रक ऊभा होता.स्टुल ठेवले होते. त्यावरून ट्रकमध्ये चढलो. पहिल्यांदाच ट्रक मध्ये बसलो होतो .त्याची गंमत वाटत होती. सगळ्याजणी खूप खूष होत्या.हसत होत्या…
ट्रक निघाला..शैलाताईंनी
“पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनीया गाठ..”
म्हणायला सुरुवात केली..आम्ही पण त्यात सुर मिसळला.. विठुरायाची गाणी, म्हणत आनंदाची वारी सुरू झाली..
ट्रकने आळंदीच्या अलीकडे सोडले. अनेक जण पायी चालत होते .आम्ही पण चालायला लागलो .
पुढे जाता जाता एकदम ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा सजवलेला रथ लांबूनच दिसला. अलोट गर्दी होती .जागेवर ऊभ राहुन दर्शन घेतलं. शैलाताई म्हणाल्या,
“गर्दी कमी झाली की आपल्याला दर्शन मिळेल तेव्हा आपण घेऊ.”
नंतर खरचं पुढे गेल्यावर आमचे शांतपणे छान दर्शन झाले.
आमची दिंडी वारीत सामील झाली.
अभंग,ओव्या,आरत्या म्हणत,टाळ वाजवत अत्यंत आनंदात मार्गक्रमण सुरू होते.
कधी पाऊस, वारा, ऊन चालूच होते. त्याचाही आनंद वाटत होता..मध्येच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसुन नाश्ता झाला.
नंतर मात्र भराभर चालायला सुरुवात झाली . दीड वाजता जेवणासाठी थोडा वेळ थांबलो .थोडसंच खाऊन घेतलं आणि पुढे निघालो.
आम्ही सगळे पासष्ठच्या, सत्तरच्या पुढच्या वयाचे होतो. पहाटेच उठलो होतो. तीन वाजल्यानंतर चालण्याचा वेग थोडा मंदावला.प्रथमच ईतकं पायी चालत होतो. काही वेळानी पुढच्या आणि आमच्या दिंडीत अंतर पडले.आम्हाला ते समजत होते.पण पाय आता दमले होते. सगळ्यांना मनात उत्साह होता पण शरीर साथ देत नव्हते.
शैलाताई समोर येऊन म्हणाल्या..
“आता आपल्याला देवाचा धावा करायचा आहे”
धावा ?…
आम्हाला काहीच कळेना.

मग त्यांनी नीट समजावून सांगितले. दिंडीचे दोन भाग केले .मध्ये जागा थोडी मोकळी ठेवली .चालत चालत एका गटाने म्हणायचे..
“आमचा विठोबा “दुसऱ्या गटानी म्हणायचे “आमची रखुमाई”
मग काय झाली की धमाल सुरू…
आधी खालच्या आवाजात म्हणत होतो .नंतर आवाज चढवत चढवत वर नेला. ते म्हणत असताना आम्हाला खूप मज्जा वाटत होती.अचानक एका क्षणी शैलाताई म्हणाल्या
“धावा “…..
शैलाताईंनी पळायला सुरूवात केली.त्यांच्यामागे आम्ही सर्वजण असलेल्या सर्व शक्तीनिशी पळायला लागलो.
त्या आवाजाचा,जल्लोषाचा, वातावरणाचा, भक्तीचा ,असा काही परिणाम झाला होता की कित्येक वर्षात न पळालेलो आम्ही धावत सुटलो…..
पुढची दिंडी गाठली आणि उंच आवाजात..
” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय “
असा जयजयकार करीत वारीत सामील झालो. अपार आनंद झाला. थकलेल्या दमलेल्या मनाला उभारी आली.
परमेश्वराची मनापासून आळवणी केली आणि त्याचा धावा केला की तो जवळ येतोच….याची प्रचिती आली.
विठोबा ही आमचाच आणि रखुमाई पण आमचीच…..
संकट आलं की तोच एकमेव तारणहार आहे हे मनाला समजते. आणि मग अंतरात्म्यातून अत्यंत प्रांजलपणे आपण त्याचा धावा करतो. त्या क्षणी तो धावा निर्मळ मनाने केलेला असतो आणि तो त्याच्या पर्यंत पोहोचतो….
आज हे सगळे आठवले …
मग लक्षात आले की..
प्रत्यक्ष जीवनातही कधीतरी हे घडते.
आपण रेंगाळतो, थोडे बेसावध होतो, थकतो आणि मग मागे पडतो… जीवनाला संथपणा कंटाळवाणेपणा येतो .
आपल्या अंगात शक्ती असते पण काय आणि कसं करायचं हे सुचत नसते.
” आमचा विठोबा आणि आमची रुखुमाई ”
हे साधे शब्द नव्हते…. ते म्हणताना ताईंनी आधी आमच्या मनातले चैतन्य जागवले होते. आम्हाला प्रोत्साहित करून चेतवले होते. हे आत्ता लक्षात येते.
प्रेरणा देणारं असं कोणीतरी समोर येतं …आपल्याला शिकवतं, सांगतं, शहाणं करतं…
कधीतरी ते आपलं अंतर्मन सुद्धा असतं .मात्र प्रयत्न आपल्याला कसून सर्व शक्ती पणाला लाऊन स्वतःलाच करावे लागतात. मग ती गोष्ट साध्य होते.हवे ते ध्येय गाठता येते.
आतून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची आस मनापासून हवी.
यासाठी मानस मात्र श्रेयस असावे ..
त्यात पाऊले” पांडुरंगाच्या “वाटेने चालत असतील तर मार्गक्रमण अजून सोपे होते .
वारकऱ्यांसारखं का ?तर ती वाट दिसते तितकी सोपी नाही… अखंड चालावं लागतं. तिथे तुमच्या क्षमतेची कसोटी लागते…..घरातलं सुखासीन आयुष्य सोडून इतके दिवस बाहेर रहायच सोपं नसतं… तिथे सोयी नसतात .मनात आलं तरी थांबता येत नाही…. प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते.
वारीत आपल्या आसपास असलेल्या लोकांना नुसतं बघायचं …वृद्ध लोक, म्हाताऱ्या बायका आनंदाने हसत खेळत चाललेल्या असतात . डोक्यावर तुळशी वृंदावन,गाठोडं ,नाहीतर पिशवी काखेत कळशी , खांद्याला शबनम याचे कशाचे त्यांना भान नसते…
अधीरपणे वारकरी पुढे पुढे पळतं असतात . मुखाने त्याचे नाव घेऊन धावा चाललेला असतो…. आणि शरीराच्या आधी मनाने तो त्याच्याजवळ पोहोचलेलाच असतो. असा त्रिगुणी संगम होऊन धावा चालू असतो असतो.कशासाठी तर पांडुरंगाला भेटण्यासाठी.
अर्थात आपला पांडुरंग कोणता… हे ज्याने त्याने मनाशी ठरवायचे …
आणि वारकऱ्यांसारखे त्या मार्गाने धावत निघायचे….
मग तो भेटतोच…
आपला पांडुरंग….
नीता चंद्रकांत कुलकर्णी-9763631255

