
2500 वर्षाच्या लिखित इतिहासात ज्यांनी आपले सागरी अस्तित्व अखंड संघर्ष करून जपले आहे.ते आगरी कोळी भंडारी कराडी गावित हे छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे लढाऊ लोक आहेत.त्यांच्या पराक्रमाचा इतिहास स्वदेशी हिंदू वैदिक इतिहासकारांनी लिहिला नाही.तो स्वतः सागरपुत्र लोकांनी लिहू नये.यासाठी मनुस्मृतीच्या माध्यमातून त्यांना लिहिण्याचा,बोलण्याचा,वेद उपनिषदे हे धार्मिक विषय ऐकण्याचा अधिकार नाकारला.तरीही परकीय इतिहासकार त्यांचा इतिहास नाकारू शकले नाहीत.शेवटी निसर्ग सागर,खाडी,नद्या,सागरी किल्ले,बंदरे यातील त्यांचे अस्तित्व कोकणचा भूगोल त्यांच्या अस्तित्वाची नोंद घेत हजारो वर्षे साक्ष देत उभा आहे.अर्थात समुद्र,वारे,भरती, ओहोटी ही कशी सातत्यपूर्ण हालचाल करतात.कधी उग्र रूपांचे दर्शन साऱ्या जगाला घडवितात.तसेच अन्यायाविरोधात बेधडक लढणारी मंडळी आमची आहेत.
मानवी गुणांचे योग्य मूल्य समजण्यासाठी स्वतःच्या जीवनात उच्च मानवी जीवन मूल्ये रुजवावी लागतात.ती केवळ उच्च कुळात,उच्च वर्णात जन्माला आल्याने वंश परंपरेने मिळत नाहीत.आपल्या कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी या सम्राट अशोक यांच्या काळातील आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक लढाया लढणाऱ्या लोकांना ओळखले होते.
छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर सागरपुत्र आगरी कोळ्यांचे केवळ समुद्र,जमीन,पाणी जंगल यांचेच अधिकार पेशवाईत संपविले गेले नाहीत.तर त्यांना शिक्षण,धर्म,मानवी हक्क नाकारून जन्माधारित गुलामीत टाकण्यात आले.याची साक्ष महात्मा जोतिबा फुले आपल्या गुलामी या ग्रंथातून देतात.लोकनेते दि बा पाटील यांना महात्मा जोतिबा फुले यांनी आपले गुरू मानले आहे.एकही आगरी कोळी महात्मा जोतिबा फुले यांना वैचारिक अर्थाने गुरू मानतो का? हा मोठा प्रश्न आहे.ज्यांनी कुणी आम्हाला धार्मिक अर्थाने गुलाम केले आहे.त्यांना गुरु मानून आम्ही स्वतंत्र होऊ शकतो का?.महाराष्ट्रात विचारांचा संघर्ष हा आम्हाला गुलाम करणाऱ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय विरुद्ध समस्त स्त्रिया शूद्र अतिशूद्र असा आहे.महाराष्ट्राच्या लोक सागरात पोहत असताना.आम्ही सावध,जागृत असले पाहिजे.
समुद्री जीवनात आपली बोट खडकावर आपटून सर्वनाश होऊ नये.म्हणून धोक्याची जागा दाखवण्याचे काम दीपस्तंभ करतो.हे आम्हा सर्वांना माहित आहे.परंतु देशाच्या, राज्याच्या राजकारणात,समाजकारणात,धर्मकारणात आम्हास धोका कुठे आहे? हे लोकनेते दि बा पाटील आम्हाला सांगून गेले.
आज सर्व क्षेत्रात आमची फसवणूक,पराभव कोणामुळे होत आहे.हे आम्हास समजत नाही.कारण आम्हास दिबा समजलेच नाहीत.लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळास का मिळत नाही.याचे उत्तर दिबानी आपल्या सिडको विरुद्धच्या संघर्षातून दिले आहे.सात बेटांच्या मुंबईचे आम्ही आगरी कोळी भंडारी कराडी ईस्ट इंडियन आदिवासी मालक होतो.मुंबई शहराच्या विकासासाठी आम्ही आमची शेती बागायती,मिठागरे,बंदरे वीटभट्टी,रेती,सागरी व्यापार यांचे बलिदान दिले होते.स्वातंत्र्यानंतर कोणत्याच सरकारने आमचे पुनर्वसन केले नाही.अर्थात मनुस्मृतीनुसार शूद्र ओबीसी आगरी कोळ्यांची सारी संपत्ती जप्त करा.कोणतेही कारण द्यायची गरज नाही हे मनुस्मृती सांगते.पेशवाईत आलेली हिंदू धार्मिक गुलामी आम्हाला समजून आली नाही.ती महात्मा जोतिबा फुले,सावित्री माई फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजली.त्यांच्या जीवन संघर्षाप्रमाणे आचरण करणारे लोकनेते दि बा पाटील होते.मुंबईच्या जमिनीची लूट करणारे याच देशातील ब्राह्मण मराठा वैश्य राज्यकर्ते समजून घेणे,हे जमीन हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक नेतृत्वाचे जमीन मालक,कुळ,घरमालक, गावठाणात राहणारे यांचे आद्य कर्तव्य आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी जमीन हवी म्हणून जमीन कसणाऱ्या शेतकरी कुळे,ताबा,कब्जा,वहिवाट दार यांचे अधिकार संपविण्यात आले आहेत.मागच्या आठवड्यात वर्सोवा कोळीवाड्यातील भंडारी समाजाचे लढाऊ नेते मनोजभाई माशेलकर यांनी अंधेरी मुंबई येथील तहसीलदार यांना ते वहिवाट अर्थात “सुप्रीम मालकीत “असणाऱ्या जमिनी बद्दल माझ्यासमोर प्रश्न विचारला.उत्तर आले अंधेरी मुंबई येथे कुळ कायदा संपला.लागत नाही.संविधानात असलेला आमच्या हक्कातील कायदा कसा संपू शकतो? अर्थात या विषयावर सोमवारी जाहीर सुनावणी आम्ही ठेवली आहे.नव्या पेशवाईची ही नांदी आहे.महाराष्ट्राचा “सातबारा जिवंत” करून वारस नोंदी करायला निघालेले माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयाच्या मुंबईत आमची ही अवस्था असेल तर देशाचे काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कुणी संपविले? मुसलमानी,इंग्रज राज्यकर्त्यांनी की पोर्तुगीजांनी याचे उत्तर सातबारा आगरी कोळी लोकांच्या हातून गेल्यावर शेतकऱ्यांना कळले.इतिहासकार काहीही म्हणोत.त्यानंतर खोत सावकार या उच्चजातीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील हे धर्माने हिंदू असून त्यांना आंदोलन का करावे लागले?. १ एप्रिल १९५७ साली आगरी कोळी भंडारी ओबीसी एससी एसटी संघर्षातून कुळ कायदा आला.पुढील तीनच वर्षात इंडस्ट्रियल झोन जाहीर करून मुंबई ठाणे रायगडात आमच्या जमिनी अक्षरशा फुकट लुटल्या गेल्या.१९७० साली सिडको आली.जेएनपीटी,नेव्ही, ओएनजीसी,सेझ,नवी मुंबई विमानतळ,नैना,एम एम आर डी,एमएसआरडी.सर्व महानगर पालिका,क्लस्टर, एसआरए यात सत्ताधारी जाती शिवाय आहे कोण? पुनर्वसन कुठे आहे.
लोकनेते दि बा पाटील यांची साडे बारा टक्के योजना ही हुतात्म्यांच्या त्यागातून मिळालेली आहे.ती आतातरी साहेब गेल्यानंतर का होईना,पूर्ण करा.असे आमचा एकही आमदार,खासदार नुसते बोलू शकत नाही.ते लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळास देतील ही अंधश्रद्धा आहे.प्रत्यक्ष देवावर श्रध्दा नाकारणाऱ्या लोकनेते दि बा पाटील यांचे आपल्या लोकांवर किती प्रेम असेल?. सिडको विरुद्ध न्यायासाठी लढणाऱ्या आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्तावर वसंत दादा पाटील हा मराठा मुख्यमंत्री गोळ्या झाडतो.आमचे लोक त्यात बळी पडतात.यात न्यायासाठी लढणाऱ्या लोकांना जो जिवंत करू शकत नाही.त्यांना ठार करणाऱ्यांना प्रश्नही विचारू शकत नाही.असा निष्क्रीय देव काय कामाचा.मला आजही प्रश्न पडतो.लोकांना न्याय देणारा आमचा नेता आमच्याच भूमीत त्याचा हक्काचा मान सन्मान मागतोय.मग देवाचे सोडा.
दगडाच्या मूर्तीत,मातीच्या मूर्तीत प्राण प्रतिष्ठा करणारे भटजी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेत.त्यांना क्षत्रिय एकनाथ शिंदे,अजितदादा पवार यांची सत्तेची तलवार सोबत असताना.शेतकरी न्यायाचे छोटेसे काम जमत नसेल?.ही सत्ता कोणासाठी?
शूद्र ओबीसी लोकांच्या विरोधी असलेल्या सत्तेला दिबा ओळखत होते.म्हणूनच आमच्या आजच्या सुखाला कारण झालेल्या पाच हुतात्म्यांचे रक्त वाया जाणार नाही.जाऊ द्यायचे नसते.याचा अर्थ दहा मिनिटे डोळे मिटून अंतर्मनात जाणा.तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल.मला समजले.ते तुम्हास समजावे म्हणून मी लढत आहे.संघर्ष करत आहे.लोकनेते दि बा पाटील ही आमची अस्मिता आहे.ती कुणाच्याही पायावर गहाण ठेऊ नका.लढत रहा.विजय तुमचा आहे.निसर्ग हाच साक्षीदार आहे.कुणाला माहीत आहे?. तुमच्या,माझ्यात कुणाच्याही,जीवनात आचरणात लोकनेते जेव्हा खऱ्या अर्थाने दिसतील.तेव्हा आम्ही विजयी होऊ.बाकी सोंगाड्याना भुलू नका.
जय आई एकवीरा.
राजाराम पाटील ८२८६०३१४६३,उरण जिल्हा रायगड.
