
मुंबई सोमवार,१८ ऑगस्ट २०२५ सकाळ वृत्तपत्रात बातमी आली.सांताक्रुझ मुंबई विमानतळ येथील मोक्याच्या जागी असलेल्या “जाकू क्लब “च्या पुनर्विकासाला गती.पोलिस संरक्षणात जागा रिकामी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश.विद्येविना मती गेली.असे ओबीसींचे आद्य गुरु महात्मा जोतिबा फुले म्हणाले होते.माता सावित्रीमाई यांनी विद्येची देवता सरस्वती शिक्षण देत नाही.म्हणून या देशात स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात केली.या दोघांच्याही विचारांची ओळख मुंबईच्या झोपडपट्ट्यात नाही. कुळ कायदा जो म्हणतो. “कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर” हे सांगणारे संविधान कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी नेते नारायण नागू पाटील यांचे फोटो झोपडपट्ट्या मध्ये कुठेच नाहीत.त्यामुळे आम्हा मुंबईची भांडी आजही घासणाऱ्या आधुनिक “शूद्रांना” महागड्या मुंबई शहरात राहण्याचे अधिकार आहेत? की नाहीत? किंबहुना ८५ टक्के मागासवर्गीय कष्टकरी स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या मुळेच, या शहराचे अस्तित्व आहे.यावर लिहायचे कुणी? वाचायचे कुणी?
येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मूर्तीच्या ढोल ताशांच्या मिरवणुकीत ढोल ताशे वाजवणारे हात आमचेच आहेत.नाचणारे पाय आमचेच आहेत.या गणपती मिरवणुकीच्या गर्दीतून,मला या वस्तीची वाट दाखविणारा,ईस्ट इंडियन (ख्रिश्चन) “डेनिस डिसुझा” हा आमचा भाऊ आहे.या लढ्यात ढालीसारखा उभा राहणारा,मुंबईचा आद्य पोलिस भंडारी ओबीसी मनोजभाई माशेलकर आमचाच आहे. मुंबईच्या सर्वच गणेशोत्सव मंडळांना माझा प्रश्न आहे.हा सण मराठी हिंदूंचा आहे.आमच्या वस्तीत आहे. आमच्या लोकांच्या वर्गणी, सहभाग आणि भाव भक्तीचा आहे.मग एस आर ए मध्ये उध्वस्त होणाऱ्या आमच्या वस्तीची चर्चा आम्ही गणपती समोर का करत नाही.?
आमच्या ओबीसी मूर्तीकार कुंभार,आगरी,कोळी, भंडारी लोकांनी मातीतून देव घडविला.त्याची पूजा आरती सेवा,त्याचे विसर्जन समुद्रात आम्हीच करणार ?.त्या देव निर्मिती करणाऱ्या हातानी विनम्रपणे,भक्ती भावनेने कधी तरी,आपल्या “मनाला” हात जोडून विचारावे.”असे का होते”?. देव,देवळे,राजांचे महाल, अगदी ताजमहाल ते मुंबईतील उंच उंच गगन चुंबी इमारती बांधणाऱ्या शूद्र ओबीसींच्या झोपड्या, त्यांच्या मनाविरुद्ध तोडण्याचे आदेश मां उच्च न्यायालय भर पावसाळ्यात देते?.तेही पोलिस संरक्षणात ? असे का होते? आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे.कदाचित मुंबईच्या वकिलांना झोपडीतल्या माणसाची भूमिका कळली नसेल? जी डॉ. आंबेडकरांना समजली होती.
मी आगरीच आहे.रोज आठ वर्तमान पत्रे वाचतो.दोन तास व्यायाम,तेवढेच बागेत काम,दोन तास वाचन करतो.सोशल मिडियावरच्या बातम्या वाचतो.तुम्हीही वाचत असाल?.उच्च न्यायालयाचे आदेश..पोलिस संरक्षणात घरे तोडण्याचे आहेत.हे वाचून आपण शांत होतो.न्यायालय म्हणतेय पोलिस घेऊन घरे तोडा.मग रहिवाश्यांच्या चुका असतील?.न्यायालय सांगते त्यावर,देव धर्म यांच्या एवढीच नवी “श्रद्धा”आम्ही निर्माण केलीय.न्यायालयास प्रश्न म्हणजे? न्यायालयाचा अपमान होईल ना? असे म्हणून आपण ती महा भयानक बातमी विसरून जातो.मागच्या सहा महिन्यात भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी निवडणूक आयोग,निवडणूक यादी यातील घोडचुका ? यावर प्रचंड चर्चा देशात घडविली आहे.लोक केवळ बातम्या ? म्हणून ऐकून सोडून देत आहेत.येणाऱ्या गणपतीत सामान्य मतदार ,त्यांच्या साविधानिक अधिकाराची ही चळवळ ढोल ताशांच्या आवाजात विसरून जाईल? यावर्षी भाजपला गणपती पावणार? पुढल्या वर्षी काँग्रेसला पावणार?.कपाळ “मोक्ष” मात्र ? भारतीय नागरिकाला,ओबीसी मतदार यांना मिळणार? कष्टाने मिळवलेली लोकशाही या देशातील ५२ टक्के ओबीसी गमावून बसतील? मिटले संविधान! हरवली लोकशाही? आम्हाला काय त्याचे?
महाराष्ट्रात सत्ता येईल देवेंद्र फडणवीस (ब्राह्मण)!एकनाथ शिंदे,अजित पवार (मराठा क्षत्रिय)! अदानी,लोढा (वैश्य) यांची,! नाही तर?.उद्धव ठाकरे (सीकेपी),शरद पवार,(मराठा) या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचीच ना? शेवटी ओबीसी शूद्र यांचे काम सेवेचे,भांडी घासण्याचेच ना? मनुस्मृतीने दिलेले काम फारच मनावर घेतलेय ओबिसिनी?अगदी मुंबई ठाणे रायगड पालघर नवी मुंबई येथील सारी घरे अनधिकृत,अतिक्रमित ठरवून महाराष्ट्र शासनाने तोडायला काढली.तशा नोटीस निघाल्यात. लोकनेते दि बा पाटील यांनी “साडे बारा टक्के” सिडको विकसित जमिनी पुनर्वसन म्हणून आम्हा आगरी कोळी कराडी ओबीसींना दिल्या.त्या लढून,पाच हुतात्मे देऊन,मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील या क्रूर मुख्यमंत्र्यांच्या दादागिरीतून सोडवल्या.त्यातील पाच हजार कोटींची जमीन मूळच्या जमीनदार खोत सावकार ब्राह्मण असलेल्या आणि छत्रपती शिवराय यांच्या आरमारी मावळ्यांचे आगरी कोळी कराडी भंडारी यांचे आरमार इंग्रजांची मदत घेऊन बुडविणाऱ्या,पेशव्याचे सरदार ब्राह्मण बिवलकर यांना.सिडको नगर विकास खाते (एकनाथ शिंदे) यांच्या क्षत्रिय शुभ हस्ते देत आहे.
आमचे देव?,आमची देवळे?,आमचे उत्सव?, आमच्यावरचा अन्याय,उघड्या डोळ्यांनी पाहताहेत. फायदा नेहमीच मनुस्मृतीच्या लाडक्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचाच होत असेल?.आमच्या हक्कांसाठी लढण्याचे बळ,आमचाच हिंदू धर्म आम्हाला हिंदुना देत नसेल? तर करायचे काय? अर्थात सर्वच धर्म, मग ते हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन,जैन,बौद्ध,शीख या साऱ्यांना माझा प्रश्न आहे.देशातील विकासाच्या नावे उध्वस्त होणारा स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्या मदतीसाठी कुणी धार्मिक,कोणता धर्म आहे का?.पुनर्वसन, पुनर्विकास हे शब्द आणि त्यांचे अर्थ ओबीसींना मती गुंग करणारे झालेत.लोकशाहीत या शब्दांचा अर्थ मनुस्मृतीच्या शब्दकोशानुसार असा निघतो.
पुनर्वसन आणि पुनर्विकास हा नेहमी उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा होतो.मां उच्च न्यायालयात यावर कुणी चर्चा करील काय? आमचे न्यायालय विषमतेच्या विरोधात,समतेच्या सोबत आहे ना?भूमीहीन गरिबांच्या सोबत आहे ना? तुटणाऱ्या गरिबांच्या झोपडीत पुनर्विकास बिल्डरांचा होतो.याचा पंचनामा पोलिस कधी करतील का?सांताक्रूझ येथील झोपडपट्टीस मी भेट दिली आहे.राजमहालात नसतील? एवढी मनाने श्रीमंत असलेली, गरीब माणसे मी या झोपड्यात पाहिलीत.
मुंबई चे किचन,बाथरूम,अंगण रस्ते स्वच्छ करणारे आम्ही शूद्र मराठी लोक आहोत.त्यांची वस्ती गलिच्छ ठरविणारे? सत्ताधारी लोक,राजकीय नेते,प्रशासक,खरे कृतघ्न “कलम कसाई” आहेत.”जाकु क्लब” हा परिसर १९७७मध्ये झोपडपट्टी घोषित केला.अर्थात याच काळात मुंबईचे आगरी कोळी भंडारी आदिवासी ईस्ट इंडियन यांचे कोळीवाडे,२०० गावठाणे “झोपडपट्ट्या” घोषित करण्यात आले आहेत.लोकांना ते माहीत नाही.मला समजले म्हणूनच मुंबीत आम्ही आगरी कोळी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी यांची गावठाण जमीन हक्क चळवळ सुरू केली.आम्ही घाणेरडे नाहीत.(SRA) हे ओरडून सांगण्याची ही चळवळ म्हणजे..
पेन्शनर माणसाने,रोज “मी जिवंत आहे.” मेलो नाही.याचा पुरावा आपल्याच सरकारला देण्याचा, “अघोरी” प्रकार आहे.कोळीवाडे गावठाणे गलिच्छ “SRA” नाहीत.हे सागितले नाहीत,तर कोणत्याही राजकीय पक्ष बिल्डर यांना ते कळत नाही.आमची लोकशाही,एकाच वेळी आंधळी,बहिरी,आणि मुकी झालीय.?आमच्या वस्त्या अतिक्रमित,अनधिकृत म्हणून पोलिस संरक्षणात तोडण्यात येतील? असे कुणी सागितले असते? तर इथल्या भूमिपुत्रांनी आजच्या सत्ताधारी जातीना मुंबईतून हाकलून दिले असते.शब्दाने, लेखणीने गळा कापणारे लोक सतत सत्तेत असतात?हे जमिनीवर परकीय शत्रूंशी इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच मोघल यांच्याशी नेहमी लढणाऱ्या ओबीसी लोकांना कुणी का सागितले नाही?.
शब्दांत खूप मोठी ताकद आहे.न्यायालयाच्या एका आदेशाने आता गरिबांची घरे तुटणार आहेत. SRA मध्ये राहणाऱ्या लोकांना पन्नास वर्षे राहिल्या नंतर जमीन मालकी हक्क कायद्याने प्राप्त होतो. मां जिल्हाधिकारी,महसूल विभाग,महसूल मंत्री यांना कायदा माहीत असूनही,राहत्या जागांचे पंचनामे करून त्यांना कायद्याने प्राप्त,साविधानिक अधिकार शासन का देत नाही?.आमच्या देशात सामाजिक धार्मिक आर्थिक विषमता आहे.हे दस्तुर खुद्द संविधान कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कबूल केले आहे.म्हणून उच्च वर्णीय विरुद्ध शूद्र या लढ्यात साऱ्या देशाने आमच्या पाठी उभे रहावे.ही नम्र विनंती! सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना पत्रकार यांना मी राजाराम पाटील कळकळीने करतो आहे.

गरीब अशिक्षित “शूद्र” लोकांना “गलिच्छ” या मराठी शब्दाचा किंवा “SRA” या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ सांगणारे शिक्षण आम्ही मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये पोहचविले नाही.देशाच्या राज्याची ही शिक्षण व्यवस्थेची लक्तरे मुंबई मध्ये विमानतळाच्या शेजारी टांगली आहेत.महाराष्ट्राच्या गडचिरोली आदिवासी पट्ट्याचे हाल विचारूच नका? त्यामुळे न्यायालयाने स्वतंत्र चौकशी समिती नेमून या झोपडपट्टी पुनर्विकासात,विकास कुणाचा होतोय? बिल्डर की शूद्र ओबीसींचा हे तपासावे.सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांना माझी या लेखातून ही जाहीर विनंती आहे.लोकांच्या विकासाचा प्रकल्प आहे.मग तो लोकांना समजावून का सांगितला जात नाही? पोलिसांची मदत घेऊन लोकांना घरा बाहेर का काढले जाते? ही हुकूम शाही नाही का?
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात आगरी कोळी कराडी धनगर बौद्ध वडार यांची घरे पोलिस घेऊन सिडकोने तोडली.जागतिक ठेवा असलेली २५०० वर्षे जुनी बौद्ध लेणी तोडली.आज अदानीचा विमानतळ झाला आहे.ओबीसी लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाची भीक आम्ही महापराक्रमी आरमारी आगरी ओबीसी सरकारच्या दारी मागत आहोत.वर्तमान काळात निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज केवळ महिलांच्या अब्रु रक्षणापोटी देत नाही.असे उत्तर देऊन,स्वतःची चोरी लपविण्यासाठी महिला मतदारांची ढाल उभी करत आहे.असल्या बातम्या न्यायालये पोलिस यांनी वाचल्या पाहिजेत.त्यांनी केलेल्या सत्य ओळखण्यातील चुकांमुळे,घरे वाचवताना माझ्यासारख्या सामान्य लोकांना फार त्रास होतो.मुंबईत एका गुंठ्याला १० कोटी रुपये भाव आलाय.दहा जन्म घेऊनही,ओबीसींच्या वाट्याला एवढी अमूल्य जमीन पुढे येणार नाही.या जमिनीसाठी उच्च जातींचे बिल्डर आणि राजकारणी टपून बसलेत.
मुंबई अगोदर शिवसेनेने लुटली आता भाजपची वेळ आहे.अर्थात सत्ता आलटून पालटून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सीकेपी अदानी अंबानी यांची आहे.यांच्या घरात यांना आंघोळीची “बालदि” उचलण्याची ताकद यांच्या हातात नाही.त्यांची घरे शूद्रानि “स्वच्छता” केली म्हणून चमकतात?. पण यांची नजर गरिबाच्या झोपड्या लुटण्यावर?.ओबिसिनो सत्ता हाती घेऊन, आमच्या मातृभूमीकडे वाकड्या नजरेने पाहणारे हे मनुस्मृतीचे डोळे,काढून घ्यायची,हिंमत तुमच्या मनगटात आणि मतदानात ठेवा.
सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे.ज्या दिवशी “जमीन मालकी हक्क” हा आमचा साविधानिक अधिकार शूद्र ओबीसींना समजेल?.त्याच दिवशी १० कोटींच्या जागेचे खरे मालक आम्ही शूद्र (झोपड्याचे मालक) अब्जाधीश होतील.जमीन हक्क देणारे स्वातंत्र्य पूर्व काळातील कुळ कायद्याचे जमीनदारी नष्ट करण्याचे डॉ.आंबेडकर ना ना पाटील यांचे आंदोलन पुढील हजार वर्षे चालवावे लागेल.
सांताक्रूझ मधल्या या झोपड पट्टीतील फक्त जमिनीची किंमत ८०० कोटी रुपये.विकसित जमिनीची चार पट म्हणजे दोन हजार चारशे कोटी रुपये आहे.सकाळची बातमी किती किमतीची आहे?..म्हणून रोज पेपर वाचत चला.
आज झोपडपट्टीत गरीब दिसणारे लोक,आपल्याच भूखंडावर कर्ज घेऊन, स्वतःच आमचे महाल बांधतील.आपला स्वयं पुनर्विकास करतील?.देवेद्रजी याल काहो बघायला?उच्च न्यायालयात आमच्या ओबीसी लोकांसाठी लढायला?तुम्ही वकील मुख्यमंत्री आहात..म्हणून विचारले.सोबत लाडक्या मामीला घेऊन या.झोपडपट्टीत राहणारे आम्ही गरीब लोक तुमची भांडी घासायला आहोत?
हे तुम्हाला माहीत आहे.म्हणूनच त्यांना जमीन पाणी जंगल शिक्षण अधिकार यांच्यापासून कायम दूर तुम्ही ठेवता?
रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या या कुणबी ओबीसी बांधवांच्या खास करून देव भोळ्या लोकांच्या हक्कासाठी लढणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरान सारखे वकील मला येत्या दोन दिवसात हवेत.दानशूर आणि लढवय्ये कार्यकर्ते हवेत.मुंबई आमची आहे.कष्टकरी लढवय्ये ओबीसींची एससी एसटी अल्पसंख्याक मुस्लिम ख्रिश्चन आणि हुंडा नाकारणाऱ्या मातृसत्ताक महिला,आया बहिणी मावश्या आज्या यांची आहे.मदतीच्या अपेक्षेत.
तुमचा लढवय्या भाऊ.
राजाराम पाटील.
८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.

