
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही,तर संपूर्ण माणुसकीसाठी प्रकाशवाट दाखवणारे विचारधन आहे. “आंबेडकरवाद” ही संज्ञा केवळ एखाद्या व्यक्तीच्या अनुयायित्वाचे प्रतिक नसून,ती सामाजिक परिवर्तनाची,समता-स्वातंत्र्य-सबंधुता या मूल्यांची प्रेरणादायी चळवळ आहे. म्हणूनच ‘आंबेडकरवादी’ कोणाला म्हणावे,याचे उत्तर शोधताना फक्त बाबासाहेबांची पूजाअर्चा करणाऱ्याना नव्हे,तर त्यांच्या विचारांची कृतीशीलता अंगीकारणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवावे लागते.
आंबेडकरवादी म्हणजे काय? जो माणूस समतेचा,न्यायाचा, बंधुतेचा आणि विवेकाचा विचार कृतीत आणतो.बाबासाहेबांनी सांगितलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मंत्र अंगीकारतो.केवळ जातीच्या आधारावर अभिमान बाळगणारा,पण आचरणात ब्राह्मणवादी रचना पोसणारा,तो आंबेडकरवादी कसा असेल? जो आरक्षण घेतो, पण समाजाच्या वंचित घटकांना सोबत घेत नाही,तो केवळ लाभार्थी ठरतो, आंबेडकरवादी नाही!
आंबेडकरवाद ही केवळ दलित मुक्तीची संकल्पना नाही,ती मानवमुक्तीची व्यापक संकल्पना आहे.धर्म,लिंग,जात,भाषा,प्रदेश या सर्व भेदांपलीकडे जाऊन “मनुष्याला माणूस म्हणून उभं करणं” ही आंबेडकरवादाची भूमिका आहे.बाबासाहेबांनी केवळ न्यायालयीन कायदे केले नाहीत, त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक क्रांतीची दिशा दिली.फक्त ‘मनूवादाचा’ विरोध करने म्हणजे आंबेडकरवाद नव्हे; तर शोषणमुक्त, समतेच्या समाजाची उभारणी हा आंबेडकरवादाचा गाभा आहे.आज अनेक जण ‘आंबेडकरवादी’ म्हणून पुढे येतात,पण त्यांचा आंबेडकरवाद केवळ फोटो लावण्यापुरता,भाषण करण्यापुरता,राजकारणापुरता,आपल्या अडचणी सोडवण्यापुरता मर्यादित असतो.खरे आंबेडकरवादी तेच,जे आपल्या जीवनात प्रज्ञा (ज्ञान),करुणा (समता) आणि शील (नैतिकता) यांचा स्वीकार करतात. बाबासाहेबांनी धर्मांतर करून जे बौद्ध जीवनमूल्ये दिली,तीच आंबेडकरवादी जीवनाची खरी दिशा आहे.
आंबेडकरवादी असणं म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहणं,वंचितांसाठी संघर्ष करणं आणि स्वतःला नैतिकतेने, ज्ञानाने,विवेकाने सुसज्ज करणं.जो वर्ग बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार होण्याऐवजी फक्त त्यांच्या नावावर राजकारण करतो,किंवा केवळ जातीचे राजकारण करतो,तो आंबेडकरवादाशी फारकत घेतो.शेवटी एवढंच म्हणता येईल की, “आंबेडकरवादी” होणं म्हणजे केवळ कोणाच्या विरुद्ध असणं नव्हे; तर सत्य, समता आणि मानवतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं होय.आणि आंबेडकरवाद म्हणजे केवळ एक विचारसरणी नव्हे,तर शोषितांच्या उद्धारासाठी चाललेली एका महामानवाची क्रांती आहे,जी आजही चालूच आहे.
रतनकुमार साळवे- 9923502320,छत्रपती संभाजीनगर
