वादविवाद की कट कारस्थान? संभाजीनगरातील राजकारणाचा उफाळलेला संघर्ष.

बातमी शेअर करा.
✍️

धारदार आणि तटस्थ विश्लेषण.

पालकमंत्री संजय सिरसाट आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यातील वाद आता एका धगधगत्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. एका बाजूला भ्रष्टाचाराच्या आरोपांचं आवर्तन आहे, तर दुसरीकडे ‘हरिजन’ शब्दप्रयोगावरून सामाजिक अस्मितेचा उद्रेक झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर २३ जून रोजी छत्रपती संभाजीनगरात जलील यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्च्याच्या उद्दिष्टावरच अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

✦कुणाचा मोर्चा, कुणासाठी?.हा मोर्चा खरंच समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आहे की राजकीय पोळी भाजण्यासाठी? हा प्रश्न अनेक तरुण विचारत आहेत.समाज माध्यमांवर सध्या एकच रणकंदन आहे.काही जण या मोर्चाला भाजप किंवा पालकमंत्र्यांची पाठराखण असल्याचा आरोप करत आहेत.काहींनी तर स्पष्टपणे म्हटले आहे की,काही मंडळींनी संजय सिरसाट यांच्याकडे सात कोटींच्या फायली अडकलेल्या असल्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी हा मोर्चा काढायचा घाट घातला आहे.

✦जलील यांचा दावा काय? इम्तियाज जलील यांनी केलेल्या स्पष्टीकरणानुसार,त्यांनी हरिजन शब्द स्वतःहून उच्चारलेला नाही. संजय सिरसाट यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांच्या दस्तऐवजामधून वाचलेला तो शब्द होता,असं ते ठामपणे सांगतात. “जर मी दोषी असेन,तर तो दस्तऐवज छापणारे सरकारसुद्धा दोषी आहे,” असा सवाल करून त्यांनी सरळसरळ कायद्यालाच आव्हान दिलं आहे.एवढंच नव्हे तर ते जामीन घेणार नसल्याची ठाम भूमिका घेत आहेत.

✦ समाजात फूट की सजगता?.सध्या आंबेडकरी तरुणांमध्ये एकवाक्यता नाही. काहीजण मोर्च्याच्या विरोधात आहेत,काही तटस्थ,काही मोर्च्याच्या बाजुने,तर काहीजण संतप्त.कारण स्पष्ट आहे.मोर्चा एखाद्या राजकीय हेतूनं प्रेरित असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.अनेक कार्यकर्ते म्हणतात की,जर खरोखरच सामाजिक भावना दुखावल्या असतील,तर सत्ताधारी पक्षांनी मूकपणे राजकारण बाजूला ठेवून पुढाकार घ्यायला हवा होता.पण येथे उलट चित्र दिसते मोर्चा आहे,पण शिवसेनेचे तथाकथित सैनिक मात्र कुठेही दिसत नाहीत.ज्यांच्यामुळे वाद निर्माण झाला,त्यांच्याच गोटात शांतता आहे.

✦संजय सिरसाट यांचं मौन अर्थपूर्ण?.एरवी २४ तास माध्यमांसमोर राहणारे पालकमंत्री संजय सिरसाट या गंभीर प्रकरणात मात्र आश्चर्यकारक शांत आहेत.आरोप त्यांच्यावर झाले असतानाही त्यांनी माध्यमांसमोर येऊन ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या मौनामुळेच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांनी मौन का बाळगले? हा खरोखरच ‘निष्पक्षतेचा’ प्रयत्न आहे की काही राजकीय गणितांचा भाग? त्यांच्या मौनामुळे या प्रकरणाभोवती अधिकच धूसरता निर्माण झाली आहे.

✦ तरुणांचं काय?.या राजकीय झगड्यात सर्वाधिक नुकसान होतंय ते तरुणांचं.कालच दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत तरुण गुंतले.पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.एकीकडे राजकीय नेते आपली मते मांडत आहेत,फाईली काढत आहेत,आरोप करत आहेत; तर दुसरीकडे सामान्य तरुण भडकतात,मार खातात आणि गुन्हेगारीच्या चक्रात अडकतात.

✦ पुढे काय?.जलील यांना अटक होणार का? मोर्चा खरोखरच यशस्वी होईल का? बौद्ध समाजातील फूट निर्माण होईल का? शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र, इतकं नक्की, या सगळ्या प्रकरणात राजकीय स्वार्थ, सामाजिक भावना आणि तरुणांची दिशाहीनता यांची त्रिसंधी झाली आहे. वाद ही लोकशाहीतील एक अनिवार्य प्रक्रिया आहे. पण तो वाद जर केवळ वैयक्तिक सूड, सत्तेचा दबाव किंवा आपलं हीत साधण्याचं साधन बनला, तर समाजासाठी घातक आहे.आपल्या भावना व्यक्त करणं हे महत्वाचं,पण ते कोणाच्या हातातलं बाहुलं बनून न करता – सजगतेनं, विवेकानं आणि व्यापक दृष्टिकोनातून झालं पाहिजे.

धारदार भुमिका घ्या – पण कोणाचं प्यादं बनू नका.!

रतनकुमार साळवे,

 संपादक, दैनिक “निळे प्रतीक” छत्रपती संभाजीनगर 8908867777

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *