महावितरणमुळे डोंबिवलीकरांचे भवितव्य अंधारात.

बातमी शेअर करा.

ग्राहक सेवा प्रतिनिधीची तक्रार घेण्यास मनाई.

डोंबिवली : विद्युत सेवा प्रदान करून एकप्रकारे लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे महत्वपूर्ण कार्य महावितरण मार्फत करण्यात येते. मात्र एखाद्या विभागात दीड ते दोन महिन्यांपासून होणाऱ्या नियमित खंडित वीज पुरवठा संदर्भात खुद्द महावितरणच अंधारात असेल तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण महावितरणला त्यांचेच ग्राहक सेवा प्रतिनिधी अंधारात ठेवण्याचे कार्य करत असून एखाद्या ग्राहकाने नियमित विद्युत पुरवठा खंडित होण्यासंदर्भात तक्रार केल्यास त्याची तक्रार “आता वीज पुरवठा सुरू झाला आहे” असे कारण देऊन नाकारली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.डोंबिवली पूर्व येथील देशमुख होम्स विभागात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून नियमित वीज पुरवठा खंडित होत आहे. २४ तासांपैकी दिवसभरात जवळपास किमान ६ ते ८ तास विद्युत सेवा कोणतीही पूर्व सूचना न देता खंडित असते. मात्र ही विद्युत सेवा नेमकी कोणत्या कारणाने खंडित होत आहे आणि याचा कालावधी नेमका किती असणार आहे? याचे उत्तर महावितरणच्या ग्राहक सेवा प्रतिनिधी यांच्याकडे सुद्धा नाही. तसेच ग्राहकांची तक्रार नोंदवून घेण्यास ते प्रतिनिधी उदासीन असल्याचे समोर आले आहे. दिनांक २३ जून २०२५ रोजी रात्री देशमुख होम्स विभागात नेहमी प्रमाणे दीड तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्या विभागातील रहिवासी सुमेध सोनावणे यांनी रात्री २ वाजता महावितरण ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करून नियमित खंडित होणाऱ्या वीज पुरवठा संदर्भात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता समोरील ग्राहक सेवा प्रतिनिधी यांनी “आता तुमच्या विभागात लाईट आली आहे” असे कारण देत तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.तसेच आमच्या एरिया टेक्निकल टीम कडून यासंदर्भात आतापर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही,असे बोलून ग्राहकांच्या समस्याचे समाधान न करता फोन ठेवून दिला.जर ग्राहकांच्या सेवेसाठी नेमलेले ग्राहक सेवा प्रतिनिधीच अशा प्रकारे सेवा देत असतील तर महावितरणणे यासंदर्भात गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक झाले आहे.दरम्यान सुमेध सोनावणे यांनी To: consumercomplaint@mahadiscom.in Cc: secy.kalyan@mahadiscom.in या इमेलवर आपली तक्रार नोंदवली असून महावितरण कडून यावर काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.त्यांनी तक्रार केलेल्या इमेलमधील मजकूर पुढील प्रमाणे: मी सुमेध वंदना मधुकर सोनावणे,देशमुख होम्स,डोंबिवली (पूर्व) येथील रहिवासी असून,महावितरणच्या सेवेसंदर्भात खालीलप्रमाणे गंभीर तक्रार करीत आहे: दि. २३ जून २०२५ रोजी नेहमी प्रमाणे रात्री सुमारे १.३० तास परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी मी रात्री २:०० वाजता महावितरणच्या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला.फोन ग्राहक सेवा प्रतिनिधी हर्षल वाडेवाले (त्यांनी सांगितलेले नाव) यांनी घेतला.त्यांच्याशी संवाद सुरू असताना लाईट पुन्हा आली आणि त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,आता लाईट आली आहे म्हणून आपली तक्रार नोंदवू शकणार नाही.तसेच एरिया टेक्निकल टीम कडून मला कोणतीही अपडेट आलेली नाही,असे म्हणत माझे बोलणे सुरू असताना मध्येच फोन ठेवून दिला.माझा प्रश्न असा आहे की… 

तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहकाने अंधारातच बसले पाहिजे का?  

वीज गेल्याचे रेकॉर्ड महावितरणकडे राहू नये म्हणून तक्रारी नोंदवल्या जात नाहीत का?  

वीज गेली असताना ग्राहक रात्री २ वाजता फोन करतो,तरीही त्याला ही सेवा नाकारली जाते,हा ग्राहक सेवेचा अनादर नाही का?

मी येथे अधोरेखित करू इच्छितो की,जवळपास गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दररोज २४ तासांपैकी एकूण ६ ते ८ तास कोणतीही पूर्व कल्पना न देता वीज पुरवठा खंडित होत आहे.याचा आमच्या दैनंदिन जीवनावर,लहान मुलांच्या अभ्यासावर, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर आणि घरून काम करणाऱ्या नागरिकांवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे याचा शाश्वत आणि सविस्तर अहवाल मिळावा ही विनंती. 

 नेमकं काय कारण आहे?  

 कोणती दुरुस्ती चालू आहे?  

 ही समस्या कायमस्वरूपी कधी सोडवली जाईल?

आम्ही एक जबाबदार ग्राहक आहोत, वेळेवर बिल भरतो.महावितरण कडून नियमित संबंधित परिसरात रिक्षात बसून माईकवर नागरिकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले जाते. मात्र त्याच परिसरात दररोज तासंतास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची अर्थात तुमच्या ग्राहकांची होणारी गैरसोयी या बद्दलची माहिती का बरं घेतली जात नाही?.सदर प्रकार संपूर्ण व्यवस्थेतील एक गंभीर त्रुटी अधोरेखित करत असून ग्राहक सेवा प्रतिनिधींची ही वृत्ती म्हणजे “लाईट आली की तक्रार अमान्य” हे तत्त्व वापरणं,हे केवळ अन्यायकारकच नाही,तर ग्राहक हक्कांच्या विरोधातही आहे.त्यामुळे कृपया आपण या तक्रारीची गंभीर दखल घेऊन माझ्या मोबाइलवर किंवा ई-मेलवर लेखी उत्तर द्यावे,ही नम्र विनंती.

सुमेध वंदना मधुकर सोनावणे,9967162063,देशमुख होम्स,डोंबिवली (पूर्व) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *