
“आजचा” काळ हा जनतेच्या वेदनांचा,असहायतेचा आणि भीतीखाली दबलेल्या मौनाचा काळ आहे.महागाई गगनाला भिडली आहे.सर्वसामान्यांचा गॅस,डाळ,दूध, तेल,वीजबिल अशा जीवनावश्यक वस्तूंवरचा खर्च नित्यनेमाने वाढतो आहे. बेरोजगारीने उच्चशिक्षित युवकांचे आयुष्य अंधारात लोटले आहे.अंगावर काटा आणणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या घटना दररोज घडत आहेत. तरीही,या सर्व अन्यायांविरुद्ध जनतेचा आवाज कुठे गायब झाला? का कुणीच उठून बोलत नाही? का लोक भयग्रस्त आणि मूक बनले आहेत?
लोकशाही म्हणजे लोकांचा,लोकांसाठी,लोकांनी चालवलेला कारभार.पण सध्याची परिस्थिती पाहता,लोकशाहीचा आत्मा हरवलेला भासतो.भीतीच्या जखमा,दहशतीचं सावट,पोलिसी दडपशाही,सोशल मीडियावर नजर ठेवून खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवणं, यामुळे सामान्य माणूस बिथरलेला आहे.जो कोणी थेट बोलतो,प्रश्न विचारतो त्याच्यावर “देशद्रोह”, “दंगलखोर”, “खोटं पसरवणारा” असे शिक्के मारले जातात.मग तो पत्रकार असो,सामाजिक कार्यकर्ता असो,किंवा सामान्य नागरिक.ही परिस्थिती नव्या स्वरूपातली गुलामगिरीच आहे.म्हणजेच,आपण स्वतंत्र आहोत पण बोलू शकत नाही. आपले विचार व्यक्त करू शकत नाही.आज आपल्या देशातली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अवस्था ICU मध्ये आहे. सरकारविरोधी बोललं की शत्रू ठरवलं जातं.सरकारी धोरणांवर प्रश्न उपस्थित केला की त्या व्यक्तीला राजकीय पक्षांचे “आंधळे भक्त” ट्रोल करतात. कायदा आणि प्रशासन यांचं संरक्षण मिळण्याऐवजी, विरोध करणाऱ्यांना जणू शिक्षा मिळते आहे.
महागाई आणि बेरोजगारी ही देशाच्या अर्थव्यवस्थेची गंभीर समस्या आहे. पण त्यावर चर्चा न होता,धार्मिक तेढ, जातीय द्वेष,सिनेसृष्टीतील वाद,ऐतिहासिक वादांवर जनता भडकवली जाते.खऱ्या प्रश्नांपासून लोकांचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे.समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून भावनात्मक विषयांवर जनतेला गुंतवून ठेवणे,हे एका योजनेचे भाग आहे.पण प्रश्न असा आहे की, लोक याला बळी का पडतात? कारण,सध्याच्या भीतीच्या वातावरणात कोणीही निभ्रीडपणे व्यक्त होऊ शकत नाही.ज्यांना समजतंय ते घाबरलेले आहेत.आणि जे घाबरत नाहीत, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. हे दृश्य एका अघोषित आणीबाणीसारखं आहे. मतप्रदर्शन हे लोकशाहीचं हत्यार आहे, पण तेच जर कुठल्याही दबावाखाली शमलं तर ती लोकशाही नाही,ती फक्त एक दिखावा आहे.हे चित्र बदलायचं असेल,तर सर्वसामान्य माणसाने उठून बोलायला हवं. ‘माझं काय जातंय?’ ह्या मानसिकतेतून बाहेर यायला हवं.अन्याय हे दुसऱ्याच्या बाबतीत घडतं असतानाच थांबवलं पाहिजे,कारण एकदा ते तुझ्या दारात आलं की कोणीच उरणार नाही तुझ्यासाठी.
समाजातील बुद्धिजीवी,लेखक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांनी या मौनाच्या मृत्युला थोपवावं.प्रत्येक ठिकाणी अन्यायाच्या विरोधात प्रश्न विचारले पाहिजेत. सत्य लिहिलं पाहिजे.भीती न बाळगता लोकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून भूमिका घेतली पाहिजे. शेवटी “भितीने समाज वाचत नाही, निभ्रीडपणाने क्रांती होते”.सरकार, प्रशासन, पोलीस,न्यायालय या यंत्रणांची जबाबदारी आहे की त्यांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा. पण जर ह्याच संस्था दडपशाहीचं रूप घेत असतील, तर जनता उघडपणे रस्त्यावर यावी लागेल. कारण लोकशाहीत अंतिम शक्ती ही जनतेकडेच असते.सध्याच्या काळात जे बोलत आहेत, तेच खरी आशा आहेत. त्यांच्या आवाजातच परिवर्तनाचे बीज आहे. पण हा आवाज एकट्याचा न राहता जनतेचा सामूहिक स्वर झाला पाहिजे. आपणच जर आपलं मौन तोडलं ,निभ्रीडपणे बोलायला सुरुवात केली, तर या अन्याय-अत्याचाराचा काळ संपणार आहे.तरच देशात खरी लोकशाही परत येईल.अन्यथा,आपण “मूक प्रजासत्ताक” म्हणून इतिहासात नोंदवले जाऊ.
रतनकुमार साळवे- ८९०८८६७७७७ संपादक – दैनिक “निळे प्रतीक” छत्रपती संभाजीनगर
