
कुळ कायद्याचे शिल्पकार लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता.सर्वेश हॉल डोंबिवली पूर्व येथे साजऱ्या होणाऱ्या अभिवादन सभेची वैचारिक भूमिका.वर्तमानकाळ हा हिंदुत्ववादी विचारसरणीने भारलेला काळ आहे.देशाचे सारे प्रश्न,मग ते सर्व जाती धर्म पंथ लिंग यातून, वेग वेगळी विविधता असलेल्या,या साविधानिक भारत देशात हिंदुराष्ट्र झाल्यानंतरच सुटणार आहेत.अशी वैचारिक मांडणी गोबेल्स पद्धतीने करणाऱ्या लोकांचे महाराष्ट्रात आणि देशातही सरकार आहेच.तरीही बहुसंख्य लोकांचे प्रश्न सुटणे कठीण झाले आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी देशाच्या एकूणच विकास,आधुनिक तंत्रद्न्यान,भारताने विश्वगुरु होणे?.या प्रचार प्रसार करणाऱ्या नेतृत्वाच्या तोंडाला फेस आणला आहे.लोकांचे प्रश्न चिघळत आहेत.आता लोकांनी कुणाच्या नेतृत्वात लढायचे?.कोणत्या विचारांचा आदर्श मानून लढायचे? हा प्रश्न देशासमोर आहे.म्हणूनच शूद्र ओबीसी जातींसमोर आपापल्या जातींनी इतिहासात केलेला संघर्ष नव्याने अभ्यासायची वेळ आली आहे.
आजचे वैदिक हिंदुत्व म्हणजेच चातुर्वर्ण्य,ब्राह्मणी विचारसरणी होय.यातूनच आजची उच्चवर्णीय जातीकडे आलेली समृद्धी,तर मागास ओबीसी एससी एसटी यांच्याकडे प्रचंड गरिबी आली.यालाच भारतातली विषमता म्हणतात.तरुण पिढीचे हे प्रबोधन झालेले नसल्यामुळे?.ते आपल्या नशिबाला,पूर्वजन्मास दोष देतात.शिक्षण असूनही, नोकरी धंद्यात येणारी निराशा याला जबाबदार धर्माची विषमता आहे.हे ओबीसी तरुणांना समजत नाही.अदानी अंबानी हे उद्योगपती कसे झाले?.त्यांना पूरक ब्राह्मण क्षत्रिय यांचे राजकारण,अर्थकारण,धर्मकारण आहे.हे जर आम्ही समजाऊन सांगितले नाही.तर भयंकर मानसिक गुंतागुंत आपल्या नव्या पिढीच्या मनात निर्माण होऊ शकते.वर्तमान काळातील समस्याप्रमाणेच इतिहासात देखील आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी माळी आणि एससी एसटी या कोकणातल्या स्त्री शूद्र अतिशूद्र यांच्यावर उच्च वर्णियानी मानसिक आर्थिक धार्मिक गुलामी लादली होती.या धार्मिक गुलामी विरोधी, आमच्या मुक्तीचे तत्वद्न्यान महात्मा जोतिबा फुले आणि माता सावित्रीमाई यांनी मांडले होते.
भारताच्या राजकीय स्वातंत्र्याची लढाई आम्ही परक्या इंग्रज,पोर्तुगीज फ्रेंच मोघल या परकीय लोकांविरोधात लढलो असलो, तरीही आम्हा ओबीसी एससी एसटी यांची सामाजिक,आर्थिक,राजकीय हक्कांची लढाई हिदू ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात होती.महात्मा जोतिबा फुले यांनी आम्हाला नवे तत्वद्न्यान नवे ओबीसी नेतृत्व दिले.माता सावित्री माई यांनी देशातल्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या खापर पणजी, आजी,आई,मावशी यांना हिंदू धर्माने नाकारलेला शिक्षणाचा अधिकार दिला.हिदू धर्मात हजारो धर्मगुरु,शंकराचार्य,बुवा,बापू,पुरोहित असताना,आप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माळी समाजातील,महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरू मानले.ही अत्यंत क्रांतिकारी घटना होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला.तर आगरी ओबीसी नेते आप्पासाहेब ना.ना.पाटील यांचा जन्म २९ ऑगस्ट १८९२ साली झाला.दोघांमध्ये एका वर्षाचे अंतर होते.अर्थात दोघेही समकालीन होते.मनुस्मृती धर्माने दिलेल्या हजारो एकर जमिनी जागा सत्ता संपत्ती,धर्म देवळे,यांच्या अमाप अधिकारांमुळे,अमर्याद सामर्थ्याने बेभान होऊन, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य स्त्रीशुद्रातीशुद्र यांच्यावर प्रचंड अत्याचार करीत होते.काळजीपूर्वक समजून घेतले तर आमची आजची परिस्थिती वेगळी नाही.कोकणात उच्चवर्णीय खोत सावकार भूमिहीन शेतकरी कुळे असणाऱ्या आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी माळी यांचे प्रचंड शोषण करीत.यातून स्त्रियाही सुटल्या नव्हत्या.हिदू धर्माने अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या एससी एसटी यांच्या अत्याचारांना सीमा राहिली नव्हती.धर्माने सारे हिंदू असूनही उच्च जातींच्या हिंदूंकडून,स्त्री शूद्र अतिशूद्र गांजले होते.आज दशावतारातील डुक्कर देवाची जयंती साजरी करा.असा फतवा सरकार मधील नेतृत्वाने काढला आहे.परंतु दशावतारातील एकही देव कोकणातील कष्टकरी कुळ शेतमजूर यांना न्याय देऊ शकत नव्हता.यदा यदाही धर्मस्य..म्हणून लोकांच्या न्यायासाठी अवतार घेण्याचे,भगवत गीतेचे तत्वद्न्यान आम्हा शूद्र हिंदूंसाठी उपयोगी पडत नव्हते.कोकणातले सारे ओबीसी शेतकरी,सारे सण उत्सव आजच्या सारखेच नित्यनेमाने भाव भक्तीने साजरे करत होते.महात्मा जोतिबा फुले यांनी आम्हा समस्त हिंदूंची गुलामी समजावताना सागितले की,ब्रम्हदेवाच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झाला.बाहुतून क्षत्रिय जन्मले.मांड्यातून वैश्य आजचे अदानी अंबानी जन्मले.हे सर्व उच्च वर्णीय हेच खोत जमीनदार होते.ब्रम्हदेवाच्या पायातून आम्ही आगरी कोळी भंडारी कुणबी माळी हे शूद्र जन्मलो.
आमच्यावर मानसिक गुलामी लादण्यासाठी वेद,उपनिषदे,कथा,पुराणे,रामायण,महाभारत यांच्यासारखे ग्रंथ लिहिले गेले.उच्चवर्णीयांनी ही मांडणी देवाचे,धर्माचे नाव घेऊन आमच्यावर लादली होती.आजची आमची गुलामगिरी ही अशा देव ,धर्म भट भिक्षुकशाहीने लादली आहे.ही गुलामी संपविण्यासाठी आधुनिक शिक्षणाची आवश्यकता आहे.हे महात्मा फुले आणि सावित्री माई यांनी सांगितले.विद्येविना मती गेली..ही गुलामीची वास्तविकता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी स्वीकारल्याचे त्यांच्या चरित्र ग्रंथातून आपल्याला दिसते.
कोकणातल्या ओबीसी शेतकरी कुळे यांच्या धार्मिक शोषणा विरुद्ध आणि अस्पृश्यते विरोधात लढण्यासाठी जो विश्व विक्रमी चरी अलिबाग येथे शेतकरी संप झाला.यावेळी आगरी कोळी भंडारी कुणबी माळी ओबीसी जातींचे लोक आणि अस्पृश्य जातीचे लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते.सर्वांच्या मुक्कामाची सोय शेतकरी परिषदेच्या मंडपा शेजारीच उभारलेल्या निवासस्थानात करण्यात आली होती.आगरी कोळी भंडारी कराडी कुणबी माळी आणि अतिशूद्र बांधवांच्या जेवणाच्या पंगती कसलाही भेदाभेद न करता एकत्र उठत होत्या.
अस्पृश्याना जवळ करून ना ना पाटील हे आगरी जात बाटवीत आहेत.अशा गदारोल्या उच्च जातीचे खोत सावकार जमीनदार यांची,तळी उचलून धरणाऱ्या पांढरपेशी पत्रकारांनी उठवल्या होत्या.परंतु त्याचा काहीएक परिणाम न होता,उलट अशा बातम्या पसरविणाऱ्या प्रतिगामी वृत्तीच्या पुढाऱ्यांना,अस्पृश्यांच्या उष्ट्या पत्रावळी स्वतः आपल्या हातानी उचलून,संपकरी शेतकरी आगरी कोळी ओबीसी लोकांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीनेच ठणठणीत उत्तर दिले.हाही या परिषदेचा सामाजिक समतेच्या दृष्टीने ऐतिहासिक ओबीसी एससी एसटी ऐक्याचा ऐतिहासिक आदर्श ठरला होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन दिवसांच्या उपस्थितीने आगरी कोळी भंडारी कुणबी शेतकऱ्यांचा धीर अधिकच वाढला होता.संदर्भ..कथा एका संघर्षाची (आत्मचरित्र) आप्पासाहेब नारायण नागू पाटील.

कोकणातल्या याच शूद्र अतिशूद्र शेतकरी ऐक्यातून पुढे “कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर” हा कुळ कायदा अस्तित्वात आला.आज पुन्हा आंदोलन विसरल्या मुळे,आम्ही आमच्या जमिनी आणि घरे,गावठाणे रोज गमावत आहोत.जमीन हक्कांचा संघर्ष हा ओबीसी जातींचा हक्कांचा विचार,उच्च जातींच्या विरोधातच जातो.याच विचारातून आगरी जातीत दोन राष्ट्रीय नेते निर्माण झाले.सिडको विरुद्ध लढणारे लोकनेते दि बा पाटील आणि सेझ विरुद्ध लढणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.दत्ता पाटील.समस्त स्त्री शूद्र आणि अतिशूद्र यांच्या मुक्तीच्या लढ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “मुक्ती कोण पथे? “या पुस्तकात साऱ्या मागास जातींच्या नेतृत्वाला स्पष्ट दिशा दिली आहे.असे लोकनेते दत्ता पाटील यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बौद्ध बंधूंना खऱ्या आर्थिक,सामाजिक,राजकीय, धार्मिक मुक्तीचा मार्ग “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथातून सांगितला आहे.सुरुवात जमीन मालकी साठी झाली तरी,शेतकऱ्यांच्या खऱ्या मुक्तीसाठी आगरी ओबीसी नेते निघाले होते.तत्कालीन शेतकरी कुळाचे आंदोलन हे केवळ जमीन जंगल पाणी यांच्या हक्कांचेच नव्हते.तर ज्या धर्माने ही गुलामी आमच्यावर लादली होती.ती समजून घेऊन त्या विरोधात बंड करण्याचे,धर्म चिकित्सा करून उपाय शोधण्याचे हे आंदोलन होते.परंतु आम्ही ओबीसी लोकांनी आमच्या जातीचे नेते,त्याची विचारधारा समजून घेतली नाही.
ज्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून आमची गुलामी संपविण्यासाठी अपार कष्ट घेतले.तेच कार्य ना ना पाटील यांनी केले.परंतु ओबीसी जातींनी आपला नेता शोधण्यात,समजण्यात आजपर्यंत जे दुर्लक्ष केले.त्यामुळे जमीन मालकी,शिक्षण आरक्षण, राजकीय हक्क हे मागच्या पिढीने देऊनही,आज आम्ही सारे अधिकार दिवसागणिक गमावत चाललो आहोत.सर्वपक्षीय उच्चजातीय नेत्यांनी हिंदू म्हणून त्याचे नेतृत्व ओबीसी जातींवर लादले आहे.ही आधुनिक गुलामी आहे.प्रत्येक मागास जातींचे शोषण उच्च जातीय लोकांकडून होते.तेव्हा मागास जातीतून एक आपला नेता पुढे येतो.या सत्याचा शोध म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी खोत सावकार जमीनदारांचे कर्दनकाळ आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचे नेतृत्व होय.

अलीकडे २०१३ साली लोकनेते दि बा पाटील साहेब यांचा मृत्य झाल्या नंतर,प्रथमच “देव न मानणारा देव माणूस गेला” अशी व्यथा आगरी समाजाने जाहीरपणे व्यक्त केली.त्यांच्या कर्मभूमीत नवी मुंबई विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे,महाराष्ट्र सरकारने दिलेले नाव नाकारून,आमच्या आगरी जातीच्या लोकनेते दी बा पाटील यांचे नाव द्या.यासाठी लाखोंचा संघर्ष आगरी कोळी कराडी ओबीसी समाजाने केला.सामाजिक राजकीय धार्मिक दृष्टीने आपले मित्र कोण ? शत्रू कोण? हे आगरी कोळी ओबीसी जातीला आता समजून येत आहे.लोकनेते दि बा पाटील दत्ता पाटील यांना घडविणारे नेतृत्व हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ना ना पाटील हे नसते? तर कोकणच्या भूमीला आमच्या आगरी कोळी भंडारी कुणबी यांची नावे लागलीच नसती.ठाणे रायगड मुंबई पालघर येथील जमिनीला सात कोटी,ते दहा कोटी रुपये गुंठा हा भाव आलाय.तो उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही येणार आहे.परंतु आम्ही जमिनी जपल्या पाहिजेत.आमच्या आजच्या जमिनी,घरे गावठाणे,जंगल,ब्रँडेड गाड्या,सोने,महागडे मोबाईल, शिक्षण,आरक्षण, राजकीय सत्ता,यांना कोणताही देव,धर्म,हिंदुत्ववादी नेता उपयोगात आला नाही.तर आंबेडकरी समाजाप्रमाणे जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष उपयोगी पडले. तसेच आमच्या आगरी ओबीसी समाजासाठी आप्पासाहेब नारायण नागू पाटील आहेत.आमच्या जातीच्या नेतृत्वाला समजून घेऊन,त्यांचे तत्कालीन विचार,त्यांचे लढे आम्ही समजून घेतले पाहिजेत.वर्तमान काळात सिडको,सेझ,एम एम आरडीए,महानगर पालिका,नवी मुंबई विमानतळ,नैना प्रकल्प,कोस्टल रोड,विरार अलिबाग कॉरिडॉर,यात आमच्या जमिनी फसवून घेतल्या जात आहेत.कायदेशीर पुनर्वसन नाही.ओबीसी लोक उध्वस्त केले जात आहेत.राज्यकर्ते तेच जमीनदार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत.विषमता,मनुस्मृती नव्या पद्धतीने लादली जात आहे.आमचे सर्वच अस्तित्व धोक्यात आले आहे.या विपरीत बिकट परिस्थितीत प्रत्येक ओबीसी एससी एसटी.बांधवांनी पुन्हा एकत्र येऊन आमचे पारंपरिक शत्रु कोण?.त्यांची आम्हास वर्तमानात गुलामीत टाकणारी षडयंत्र,कारस्थाने शोधून,समजून घेऊन, त्यावर काळ सुसंगत उपाय शोधले पाहिजेत.आमच्या अस्तित्वाचा संविधानिक,अहिंसक लोकशाही लढा उभा केला पाहिजे.त्यासाठी पैसे,मनुष्यबळ,साधने जमा केली पाहिजेत.याल ना या अभिवादन सभेला.आगरी कोळी ओबीसींच्या डोंबिवली नगरीत.
राजाराम पाटील.८२८६०३१४६३.उरण जिल्हा रायगड.

(वरील मोबाईल नंबर वर आपली प्रतिकिया नोंदवा.तुम्ही कोकणात अनेक बुवा बापू दादा नाना यांना धर्म म्हणून लाखोंची मदत केलीत.त्याच प्रमाणे ज्यांनी जमीन जागा,आजचे सारे वैभव आम्हास दिले.त्या आगरी जातीच्या नेतृत्वासाठी एक रुपया देऊन कृतीने आपली कृतज्ञता व्यक्त करा.ही नम्र विनंती.)
