
आज आपण 7 फेब्रुवारी हा दिवस रमाई जयंती म्हणून साजरा करीत आहोत.तरी हा रमाईचा जन्मदिवस याआधी कोणत्याही लेखकाने आपल्या पुस्तकामध्ये नमूद केला नव्हता. तसे पाहिले तर अथक प्रयत्न,संशोधन करून दलित पॅंथर चे सह संस्थापक, मराठी साहित्यिक,आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक,भाष्यकार आणि विचारवंत आदरणीय ज.वि.पवार साहेब माझे थोरले बंधू यांनी रमाईचा जन्मदिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचा विवाह दिवस या दोन तारखा अथक प्रयत्नांनी शोधून काढल्या.आणि त्यामुळे आज सर्व समाज ७ फेब्रुवारी हा रमाईचा जयंती दिवस म्हणून साजरा करीत आहोत.आणि चार एप्रिल विवाह दिवस देखील साजरा करीत आहोत.2010 साली “बाबांची रामू “लेखक ज. वि.पवार त्यांनी पुस्तक प्रसिद्ध केलं आणि 7 फेब्रुवारी 1897 हा दिवस रमाईंचा जन्मदिवस आहे.व 4 एप्रिल 1906 रोजी भीमराव आंबेडकर व रमाई यांचा विवाह दिवस आहे हे त्यात नमूद केले आहे.
रमाईचे माहेरचे नाव भागीरथी ठेवण्यात आले होते. परंतु सर्वजण त्यांना रामी म्हणत.बालपणीच रमाची आई रुक्मिणीने रमावर चांगले संस्कार केले होते.अब्रून राहावं.आई बापाच्या नावाला बट्टा लावू नये. मन लावून नवऱ्याचा संसार करावा. स्वच्छ मनाने जगावे.बेटा कष्टशिवाय माणूस मरतो.कष्टाने नाही मारत. आयुष्यात कुणाचही वाईट चिंतू नये कोणाची निंदा करू नये.आपलं काम नेटाने करत राहावं.चांगल्या गोष्टीला दुनिया चांगलं म्हणत नाही पण तेवढ्यामुळे वाईट गोष्टी करून मान मिळवणं चांगलं नाही.दुनियेत गुणांची कदर होते. पण जरा,उशिरा.आपण स्वच्छ असावाएक ना एक दिवस आपली कदर होतेच.वाईट बोलणाऱ्याच्या माना एक ना एक दिवस खाली जातात.असे अनेक संस्कार रुक्मिणीने रमावर केले होते.
एकदा रखमान रामिला सांगितले. “बाईचा जन्म खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरात तू हळूच डोकावून बघ. तिथे पहाटे पासून रात्री अकरा वाजेपर्यंत सदा कष्ट कष्ट आणि कष्ट.हसत हसत कष्ट उपसणारी तुला एक मूर्ती दिसेल.तिचं नाव बाई.घरची कारभारीन,माघारीन,जन्मल्यापासून लग्नाच्या पर्यंत आई बापाच्या घरी.लग्नापासून मरे पर्यंत नवऱ्याच्या घरी कष्ट उपसणारी राबणारी बिन मोबदल्याची कामवाली बाई म्हणजे आपली बाईची जात. नवरा म्हणजे बाईचं सारं काही. नवऱ्याला आवडेल तेच करायचं. त्याच्या तब्येतीला जपायचं. ती स्वतःला विसरते पण नवऱ्याला जपते”.तसाच एक बालपणीचा प्रसंग बंधू माधव यांनी आपल्या पुस्तकात दिलेला आहे. रामी पूजा करते.आणि नंतर आईचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकते. त्यावेळी तिच्या खिशातून दोन-चार पैशाची नाणी आवाज करीत खाली पडतात.रखमा विचारते..एवढे पैसे कसे तुझ्याकडे ? त्यावेळी रामी म्हणते. शेजारच्या राधा मावशीने दिले. तिला, मी दुकानातून माल आणून दिला. सुट्टी राहिलेले पैसे माझ्या हाती देत म्हणाली. फुटाणे घेऊन खा.रखमा रामीला म्हणाली. तू ते पैसे का घेतलेस ? रखमाने रामीला खूप मारले. आणि तिला बोलली. आतापर्यंत तुला शिकवले ते सारं चुलीत गेलं.? पालथ्या घड्यावर पाणी झालं ? तु जा राधाला पैसे परत देऊन ये.आईचा असा अवतार तीने यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. परत आल्यावर रामीला म्हणाली. कुणाचेही पैसे घेतले तशीच सवय लागते. अशांन मिंध होतं. मुलीच्या जातीने लग्ना अगोदर आई बापाच्या व सख्ख्या भावाच्या पैशाशिवाय आणि लग्नानंतर नवऱ्याच्या पैशाच्या शिवाय कुणाच्याही पैशाला हात लावायचा नसतो.असे चांगले चांगले संस्कार रखमाने रामीवर केले होते. त्यामुळे रामीची रमाई झाली. हे सर्व आईचे संस्कार.
रमा आणि भीमराव यांचा विवाह 4 एप्रिल 1960 ला संपन्न झाला. रमा नऊ वर्षाची होती तर भीमराव 14 वर्षाचे .रमा निरक्षर होती. तर भीमराव शिकलेले होते. परंतु शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते म्हणून ते रमाला म्हणाले. रामू तू शिकले पाहिजे. तेव्हा रमा त्यांना म्हणाली. मी शिकून काय करणार ? तुम्ही खूप शिका मोठे साहेब व्हा. अग रामू, मी तर शिकणार आहेच. परंतु या समाजातील,नवे देशातील प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेतले पाहिजे. तरी रमा भीमरावाचे काही ऐकले नाही. तेव्हा तिला समजावून सांगितले.समज मी जर उद्या बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी गेलो. तेव्हा जर मी तुला पत्र पाठवले. ते तुला वाचता आले पाहिजे. पण तू स्वतःहून मला पत्र लिहिले पाहिजे*. तरीही रमाने शिक्षणासाठी तयार होईना. शेवटी भीमरावानी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची गोष्ट रमाला सांगितली. सावित्रीबाई कशा शिकल्या .कसा त्याग केला. ते ऐकून मात्र रमाने ठरवले.आपण पण शिकले पाहिजे आपले पती एवढे सांगतात त्यांच आपण ऐकायला पाहिजे.असे आपल्या आईने आपल्याला शिकवले आहे.सांगितले आहे भीमरावांनी रमाला साक्षर केले. स्वतःची सद्विवेक बुद्धीला साक्षी ठेवून शिक्षित झाली.स्वतः शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि साक्षर झाली. रमाई म्हणजे त्याग, त्याग आणि त्याग.मग तो आपल्या आई-वडिलांचा असो. आपल्या मुलांचा असो.दाग दागिन्याचा असो.किंवा अन्नाचा असो.या सर्व गोष्टींचा त्याग केला म्हणून ती त्यागमुर्ती ठरली.पण हा सर्व त्याग करताना देखील तिच्या अंगी जे अनेक गुण होते ते गुण आत्मसात करणे म्हणजे रमाई जयंती साजरी करणे होय.
सहनशीलता माता रमाईंकडे सहनशीलता हा गुण होता. तिने आपल्या आयुष्यात मुलगा रमेश याचा मृत्यू झाला. परंतु ती बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळवले नाही. ते दुःख स्वतः सहन केले.कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासात व्यत्यय होईल. नंतर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितली.घरामध्ये समस्या अनेक होत्या परंतु त्या पत्रातून न सांगता स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या.चांगला अभ्यास करा असे पत्रातून सांगत असे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला असताना गंगाधर मरण पावला ते दुःख देखील तिने बाबासाहेबांना सांगितले नाही आणि नंतर सांगितले. स्वतः मात्र ते दुःख सहन केले.
निर्भय रमाई चवदार तळ्याचा सत्याग्रह केला रायगडावर शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी गेले.त्या प्रसंगी बाबासाहेबांच्या हत्येचा कट रचला गेला होता. ती बातमी रमाईंना समजली.परंतु माता रमाईने निर्भयपणे स्वतः सहन केली. तसेच काळाराम मंदिर असो पुणे करार या वेळी देखील रमाईने मोठा निर्भयपणे बाबासाहेबांच्या पाठीमागे उभे राहिल्या. पुणे कराराच्या वेळी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवे मारण्याची धमकीची पत्रे येत होती. *परंतु कधीही रमाने तुम्ही सत्याग्रह चळवळ करू नका.शोषित,पिडीत त्यांच्यासाठी कार्य करू नका. असे रमाने म्हटले नाही. माता रमाईचा जीव की प्राण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.रमाईना माहीत होते सर्व समाजाच्या उद्धाराचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करीत आहेत. आपण त्यांना त्यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणता कामा नये.स्वाभिमानी रमाई.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायातेला असताना कुटुंब चालवण्यासाठी गोवऱ्या थापण्याचं काम केलं परंतु आपल्या साहेबांची बदनामी होऊ नये म्हणून भल्या पहाटे गोवऱ्या थापण्यासाठी जात आणि अंधार दूर होण्यापूर्वी घरी परत येत.घरात काही अन्न नसताना स्वतः आणि मुलांनाही उपाशी ठेवले.परंतु दुसऱ्याच्या दारी केव्हा गेल्या नाहीत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनला असताना आर्थिक टंचाई निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी यांनी माता रमाईंना आर्थिक मदत देण्यासाठी आले. परंतु माता रमाई ने ती नाकारली.स्वाभिमानी शब्द बोलण्यासाठी ठीक आहे परंतु जेव्हा प्रसंग येतात तेव्हा स्वाभिमानाची परीक्षा होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेला जाणार होते त्यावेळी शाहू महाराज त्यांना भेटायला आले होते त्यावेळी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले तुम्ही विलायतेला जा. तुम्ही परत येईपर्यंत,रमाई माझी धाकटी बहीण आहे.तिला मी माझ्याकडे घेऊन जातो. तुम्ही आल्यानंतर मी तुला सुखरूप इकडे आणून सोडतो. त्यावेळी स्वतः रमाईने नकार देत महाराजांना म्हणाल्या तुम्ही व्यक्त केलेल्या सहानुभुती बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर त्या आधीच रामजी बाबांचे 1913 ला निधन झाले होते.रमाईचा दिर आनंदराव यांचेही निधन झाले होते. कुटुंबामध्ये कमावते कोणीही नव्हते.परंतु कुटुंबात सदस्यांची संख्या जास्त होती रमा, यशवंत लक्ष्मी,मुकुंद शंकर,गौरी.एवढी लोक असताना देखील रमाने कोणाकडून मदत मागितली नाही किंवा मदत स्वीकारली देखील नाही स्वतः कष्ट करून स्वाभिमानाने जगली.काटकसर करणारी रमाई गोवऱ्या थापून ते पैसे जमा करून मनी ऑर्डर परदेशात आपल्या पतीला पाठवणारी एकमेव माता रमाई होती.पतीला सतत साथ देणारी रमाई 1923 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होऊन भारतात आले आणि वकिलीच्या व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला.परंतु अस्पृश्य म्हणून त्यांना कोणी केसेस देईना तेव्हा घरी येत आणि गप्प बसत. दुःखी कष्टी होऊन बसत.ज्या ज्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुःखी व्हायचे तेव्हा रमाई त्यांना म्हणत असे.मी आहे ना? कुटुंबाचा संभाळ करायला. मी या कुटुंबाचे दुःख रस्त्यावर आणणार नाही .समाजात दाखवणार नाही.मी गरीबाची लेक आहे.मला दुःख सहन करण्याची, दुःख पेलण्याची सवय आहे या कुटुंबाचा परिवाराचा काटेरी मुकुट मी एक वेळ धारण केलेला आहे तो मी माझ्या मृत्यूपर्यंत कधी खाली ठेवणार नाही.कुटुंबात समन्वय साधणारी रमाई.रमाईने संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवले.आनंदरावांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगा मुकुंद यांना देखील सांभाळले. एवढेच आम्ही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळाराम यांचे पटायचे नाही. त्यामुळे बाळाराम वेगळे राहायचे. परंतु आपल्या घरी विशेष काही जेवण बनवले तर यशवंत आणि मुकुंदाला सांगून त्या आपल्या दिराना पाठवायच्या. त्यांचे दिर बाळाराम हे देखील पदार्थ खाऊन झाल्यावर म्हणायचे.माझी भावजय म्हणजे आंबेडकर कुटुंबातील एक रत्न आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असे म्हणतात रमाला आणि लक्ष्मीला मी कधीही एकमेकांशी भांडल्याचे ऐकले नाही. ते पाहिले नाही असे म्हणत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक काळ बाहेर राहत होते.रमाईच्या मृत्यूनंतर थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईंना अर्पण केला आहे त्या प्रस्तावनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रमाईच्या हृदयाचा चांगुलपणा तिच्या मनाची विशालता,तिच्या चारित्र्याची पवित्रता तिने अशी धारण करून माझ्यासोबत तिने दुःख सहन करण्याची अशी शक्ती निर्माण केली होती की ज्या प्रसंगी दुःखाचा डोंगर कोसळला तरी हे माझं नातं टिकून ठेवलं अशा स्वाभिमानी कर्तव्यदक्ष जिवाळीवृत्ती रमाईस माझा हा ग्रंथ समर्पित.
कोण म्हणतो.तू सात कोटीची माय
कोण म्हणतो. तू नऊ कोटीची माय
मी म्हणतो तू सगळ्यांची माय
दाखवा,मला एखादा भारतीय
ज्याच्यावर माझ्या रमाईचे उपकार नाय
रमाई म्हणजे कठोर कर्तव्यनिष्ठेचे मूर्तीमंत प्रतीक,रमाई म्हणजे आदर्श गृहिणी, व कर्तव्यदक्ष व प्रेमळ पत्नी रमाई म्हणजे त्याग,संघर्ष,तडजोड,कर्तव्य,जाणीव. आणि सदगुणांची खाण आपण रमाई जयंती किंवा स्मृती दिन साजरा करताना रमाईचे गुण अंगीकार करून आपल्या जीवनात उपयोग करणे म्हणजेच रमाईची जयंती करणे होय. तरी रमाईंच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन
संजय सखाराम पवार –9137440340
खांडोत्री-तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी.

