कामगारांच्या हक्कांवर गदा येत असताना मौन का?.कामगारांच्या नावाने कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी आत्मपरीक्षणाचा प्रश्न

विशेष प्रतिनिधी यवतमाळ – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आज राज्यभर सुमारे २०,००० हून अधिक व्यक्तींची उपजीविका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुरू असल्याची माहिती आहे. प्रत्येक जिल्ह्यात अंदाजे १,५०० ते २,००० एजंट,ऑनलाइन सेवा केंद्रे, कामगार प्रतिनिधी आणि इतर मध्यस्थ नवीन नोंदणी,नूतनीकरण,शैक्षणिक सहाय्य,शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांचे अर्ज भरण्याचे काम करीत आहेत. म्हणूनच हा प्रश्न केवळ कामगारांचा राहिलेला नाही; तर या संपूर्ण व्यवस्थेशी संबंधित हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा झाला आहे.
आज प्रत्येक ऑनलाइन सेवा केंद्रावर शिष्यवृत्ती,शैक्षणिक सहाय्य आणि इतर योजनांच्या अर्जांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते.अनेकजण या कामातून सेवा शुल्क घेऊन आपली उपजीविका चालवतात.अनेकजण स्वतःला कामगारांचे प्रतिनिधी म्हणूनही सादर करतात.मात्र प्रश्न असा आहे की,जेव्हा कामगारांच्या हिताच्या योजना बंद होतात,लाभ कमी होतात किंवा पात्रतेच्या अटी अशा बदलल्या जातात की हजारो कामगार लाभापासून वंचित राहतात,तेव्हा हे सर्वजण नेमके कुठे असतात?. कामगारांच्या हक्कांवर गदा येत असताना मौन का?.कामगारांच्या नावाने कार्य करणाऱ्या प्रत्येकासाठी आत्मपरीक्षणाचा प्रश्न
कामगारांकडून अर्ज भरण्यापूर्वी आपण स्वतःला त्यांचे प्रतिनिधी म्हणवून घेतो; मग त्यांच्या हक्कांवर गदा येत असताना त्यांच्यासाठी उभे राहण्यास आपण कोणाला किंवा कशाला घाबरत आहोत? यापूर्वी काही मोजक्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढे दिले,रस्त्यावर आंदोलने केली आणि कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्या संघर्षाची किंमत ही त्यांनी मोजली. तरीही त्यांनी आपली भूमिका सोडली नाही.मग आज,जेव्हा शैक्षणिक सहाय्य,पदवी पदव्युत्तर लाभ आणि इतर महत्त्वाच्या योजनांवर परिणाम करणारे निर्णय होत आहेत,तेव्हा उर्वरित सर्वांनीही संघर्षात सहभागी होणे ही त्यांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी नाही का?.संघर्षाची जबाबदारी नेहमी काही मोजक्यांनीच घ्यायची आणि बाकीच्यांनी केवळ अर्ज भरायचे, सेवा शुल्क घ्यायचे आणि आपले व्यवहार सुरू ठेवायचे हीच का कामगार चळवळीची दिशा आहे?.
आज प्रत्येक एजंट,प्रत्येक ऑनलाइन सेवा केंद्र, प्रत्येक कामगार प्रतिनिधी,प्रत्येक संघटना आणि कामगारांच्या नावाने कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःला एकच प्रश्न विचारावा.आज आपण शांत राहिलो,तर उद्या योजना आणखी मर्यादित झाल्या, अर्ज कमी झाले किंवा लाभच बंद झाले, तेव्हा आपल्या स्वतःच्या उपजीविकेचे काय होईल?. आजचा संघर्ष केवळ कामगारांच्या हक्कांसाठी नाही; तर या क्षेत्राशी संबंधित हजारो कुटुंबांच्या भविष्यासाठीही आहे.मौन सोडा.भूमिका घ्या.एकत्र या.आणि कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे रहा.कारण कामगारांच्या नावाने काम करणे ही केवळ उपजीविका नाही,ती एक सामाजिक,नैतिक आणि संघटनात्मक जबाबदारी आहे.कामगारांची लूट करणारे दलाल,एजंट आणि CSC सेंटर चालकांनो.आता कुठे गायब झालात? कामगारांनो, जागे व्हा आणि जाब विचारा!
जेव्हा कामगार कल्याण मंडळाचे ऑनलाइन पोर्टल बंद होते, तेव्हा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी फक्त आणि फक्त कामगार संघटनाच रस्त्यावर उतरून संघर्ष करत होत्या.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राणाची बाजी लावून, संघर्ष करून सरकारला पोर्टल पुन्हा सुरू करायला भाग पाडले!.पण जसे पोर्टल सुरू झाले,तसे तोपर्यंत बिळात लपलेले फिरते दलाल,एजंट आणि काही CSC सेंटर चालक किड्यांसारखे बाहेर आले.जे लोक नियमात बसत नव्हते,अशा लोकांकडूनही नोंदणी आणि रिन्यूव्हलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. कामगारांकडून हजारो रुपयांचे कमिशन वसूल करून स्वतःचे खिसे भरले आणि सरकारी कामगार अधिकारी विभागातील भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भले केले! यांनी कामगार कार्यालयातील कामगर कर्मचारी संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट करून सोडली.असंघटित कष्टकरी कामगारांच्या पैशांवर हे दलाल व कर्मचारी अधिकारी आज आर्थिकदृष्ट्या गब्बर झाले आहेत.पण आज परिस्थिती काय आहे? दिनांक १३ जुलै २०२६ रोजी शासनाने कामगार कल्याण मंडळाची पहिली ते नववी, ११ वी आणि डिप्लोमा-डिग्रीची शैक्षणिक योजना थेट बंद केली आहे! कामगारांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. मग आता हे कमिशन लाटणारे दलाल, एजंट आणि CSC सेंटरवाले कुठे झोपलेत की काय? स्वतःला कामगारांचे प्रतिनिधी म्हणवून घेणारे हे लुटारू आता कुठे गायब झाले?
कामगारांनो, आता तरी जागे व्हा! संकट येते तेव्हा फक्त संघटना पुढे येते. ज्या दलालांना आणि एजंटांना तुम्ही पैसे देऊन मोठे केले, त्यांना आज त्यांच्या कर्तव्याची आठवण करून द्या. ज्यांनी तुम्हाला लुटण्याचे काम केले, त्यांना आता आपल्या मुलांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरायला भाग पाडा! “कमिशन लाटताना ‘पुढारी’, योजना बंद झाल्यावर ‘फरारी’!.” अन्याय विरोधात लढली संघटना, सुरू झाले पोर्टल. लगेच माजले दलाल, लुटला कामगार!
असंघटित कष्टकरी बांधकाम कामगारांना आवाहन: कामगारांनो, दलालांना पोसणे बंद करा. ज्यांनी तुमचे पैसे खाल्ले, त्यांना जाब विचारा आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी कामगार संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा! ”कामगारांनो, डोळे उघडा आणि स्पष्ट ऐका! जोपर्यंत ‘कामगार संघटना’ मैदानात खंबीरपणे उभी आहे, तोपर्यंतच तुमचे हक्क आणि अधिकार जिवंत आहेत. जर तुमच्या चुकीमुळे संघटना कमकुवत झाली, तर उद्या काबाडकष्ट करून तुम्ही मेलात, तरी तुमच्या कुटुंबाला साधे कुणी विचारणार सुद्धा नाही. लूट करणाऱ्या दलालांना मोठे करण्याऐवजी, आपल्या न्याय-हक्कासाठी कायदेशीर लढाई लढणाऱ्या संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. संघटना टिकेल, तरच तुमचा अधिकार टिकेल!”
एक कामगार संघटना प्रतिनिधीचा रोकडा सवाल… विचार करा आणि जागे व्हा!

उप जिल्हा कार्यकारी तथा सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ यांना रत्नपाल गोवर्धन डोफे अध्यक्ष जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना,यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली सम्येक राजेंद्र म्हैसकर सचिव सौ.सुजाता रत्नपाल डोफे कोषाध्यक्ष,कु.कल्याणी रत्नपाल डोफे कार्यालय प्रमुख, शुभम डोंगरे,वर्षा वाकोडे,प्रेमीला बोबडे,यांनी भेट घेऊन निवेदन दिले.उप जिल्हा कार्यकारी तथा सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ यांनी ताबडतोब निवेदनाची दखल घेऊन मुंबई कार्यालयाला पत्र पाठविले.
रत्नपाल डोफे ७४९९६४४२२६,अध्यक्ष जनवादी कामगार संघटना यवतमाळ यांस कडून

