17 मे रोजी मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

विशेष प्रतिनिधि मुंबई :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या निधीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर येत्या 17 मे रोजी मुंबईत एक दिवसीय “भारतीय साधनसंपत्ती परिषद” आयोजित केली आहे.या परिषदेत एसएनडीटी विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा.डॉ के एस इंगोले , सुप्रसिद्ध मिलिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ इंद्रजित आल्टे यांच्यासह विविध जाणकार अर्थसंकल्पाचं विविध पैलू उलगडून दाखवणार आहेत.नायगांव,दादर (पूर्व) येथील प्रा.सुरेंद्र गावस्कर सभागृहात भरणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा आशालता कांबळे करणार आहेत.परिषदेत शिक्षण व आरोग्याच्या अर्थसंकल्पासह अनुसूचित जाती – जमाती,भटके विमुक्त – ओबीसी तसेच महिला,शेतकरी व धार्मिक अल्पसंख्य यांच्या अर्थसंकल्पातील वाट्याची चर्चा करण्यात येणार आहे.यांत शुद्धोदन आहेर,प्रा जगदेव इवने,प्रदीप ढोबळे,शरद गायकवाड,प्रकाश शिवशरण,पद्मा कांबळे, डॉ रसिक वारभुवन आदि अभ्यासक सहभागी होणार आहेत. तसेच ‘विविध राजकीय पक्षांनी अर्थसंकल्पाबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी यावे’ या आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गणेश हाके (भाजप), सुरेशचंद्र राजहंस (काँग्रेस), किरण सोनावणे (शिवसेना – शिंदे), सुषमा अंधारे (शिवसेना – ठाकरे), विद्या चव्हाण (राष्ट्रवादी – शरद पवार) हे मान्यवर आपल्या पक्षाची अर्थसंकल्प विषयक भूमिका मांडणार आहेत.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनाही आंमत्रित केले आहे. आंबेडकरवादी पक्षांच्या वतीने हेमंत रणपिसे (आरपीआय – आठवले), मुकुंद सोनावणे (बसपा), बी डी बोरकर (बामसेफ) व सिद्धार्थ मोकळे (वंचित बहुजन आघाडी) हे देखील आपली भूमिका मांडणार आहेत.
अर्थसंकल्पाबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासक यांची भूमिका समजून सांगण्यासाठी खासदार चंद्रकांत हंडोरे,माजी नगरसेवक अरुण कांबळे व सेवानिवृत्त सनदी अधिकारी आर के गायकवाड,माजी सहसचिव दिनेश डिंगळे हे संवाद साधणार आहेत. माहिती अधिकाराबाबत माजी सहसचिव सुरेश सोनावणे मार्गदर्शन करतील. अमरावती येथे किराणा दुकान,तूर डाळ मिल, ॲाईल मिल,पतपेढी असे विविध आर्थिक प्रयोग यशस्वी करणाऱ्या ‘वुई’ आर्थिक चळवळीचे राहुल मेश्राम व अनिता गवई मुंबईकरांना आपले अनुभव सांगायला येत आहेत. त्याचप्रमाणे “आंबेडकरवादी सहकारी चळवळीची आवश्यकता” या विषयावर डॉ निशिकांत वारभुवन मार्गदर्शन करतील.मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी युनियन, ‘वुई’ आर्थिक चळवळ व सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, मुंबई विभाग यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले असून सामाजिक न्याय खात्याच्या निधीबाबत चाललेला वादविवाद लक्षात घेऊन जनतेने या परिषदेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आपल्या आर्थिक अधिकाराविषयी जागृत व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सागर तायडे यांस कडून
