
ज्या व्यक्तींचा जन्म 1950 ते 1970 च्या दरम्यान झाला ते फार भाग्यवान आहेत. त्या व्यक्तींची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची होती.खायला धड अन्न मिळत नव्हते ना धड अंगावर कपडे. अशा या दारिद्र्यातून देखील आई-वडिलांनी या मुलांना शिक्षण दिले.नंतर ही मुलं शाळेत गेली, खूप मेहनत घेतली,काबाडकष्ट करून प्रसंगी उपाशीपोटी राहून या मुलांनी शिक्षण घेतले.पदवी व पदव्युत्तर शिक्षण झाल्यामुळे नोकरीला सुद्धा लागले.पण कदाचित नोकरी कोणामुळे लागली हे काही लोकांना माहीत नसेल.तर आपल्या सर्वांना नोकरी लागली त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला समाज म्हणजे शेड्युल कास्ट वर्ग.या समाजामुळे ही नोकरी आपल्याला लाभली.जर उच्च वर्गातील व्यक्ती असती किंवा ओबीसीमध्ये जरी असती तरी नोकरी मिळणे दुरापास्त झाले असते.दुसरे कारण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत आपल्या अस्पृश्यांची बाजू जोरदार मांडली.त्याचीच परिणीती म्हणून त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी 17 ऑगस्ट 1932 ला “जातीय निवाडा’ मंजूर केला.हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व आपल्या अस्पृश्य समाजाचा फार मोठा विजय होता.
1932 पासून आपल्या समाजाची हळूहळू प्रगती विकास उन्नती होत गेली.भारताला स्वातंत्र्य मिळाले.संविधान सभेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या कष्टाने,मेहनतीने निवडून आले. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर येऊ नये म्हणून अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढविल्या.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष बनले.त्यांनी एससी,एसटी करिता काही खास तरतुदी करून ठेवल्या.तसेच ओबीसी करता सुद्धा आयोग नेमून त्यानुसार त्यांनाही नोकरी मिळावी अशा प्रकारची तरतूद करून ठेवली होती.परंतु ओबीसी आयोग लागू होण्याकरता 1990 साल उजाडावे लागले.त्यासाठी मान्यवर साहेब कांशीराम यांना फार मोठा संघर्ष करावा लागला.हा इतिहास आपणास सर्वांनाच माहित आहे.
भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू झाले तेव्हापासून आपल्या समाजाची प्रगती सुरू झाली.त्या अगोदर आपण दोन हजार वर्षापासून वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा करीत होतो.त्यांना बकऱ्याचा,कोंबड्याचा नवस देत राहिलो.परंतु एकही देव- देवी आपल्याला प्रसन्न झाली नाही.या उलट आपल्याला गावकूसा बाहेर राहण्यास भाग पाडले.कोणीही आपल्याला शिवत नव्हते.तहान लागल्यावर आपल्याला कोणी पाणी पाजत नव्हते.एखाद्या दयाळू व्यक्तीने पाजले तरी ती व्यक्ती दोन फुटावरून पाणी टाकत होती व ओंजळ करून आपण पाणी पीत होतो व तहान भागवत होतो.आपली सामाजिक, आर्थिक,राजकीय व धार्मिक परिस्थिती फारच बिकट होती. आपल्याला देवानेही या गुलामीतून मुक्त केले नाही किंवा कोणत्याही उच्चवर्णीयंनी आपली मदत केली नाही.आपला एक तारणहार आपल्या मदतीला धावून आला,त्याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.आपण बाबासाहेबाचे आजन्म ऋणी असायला पाहिजे.खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्याकरता देव आहेत. ते देवा पेक्षा कमी नक्कीच नाहीत.परंतु दुःखाची गोष्ट अशी की ज्या मंदिराने आपल्याला कोणतीच मदत केली नाही,तरीही आपल्या समाजाची काही लोक अजूनही मंदिरात चकरा मारतात. बोकड्याचा कोंबड्याचा नवस देतात.त्यांची मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही.अर्थातच याला अपवाद आहेत,बरेच लोक आता फुले -शाहू-आंबेडकरी विचारधारा मानतात.जोपर्यंत आपला समाज या देव देवीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा खऱ्या अर्थाने पूर्ण विकास होणार नाही. कारण असे की जर क्लास वन अधिकारी मंदिरात जात असेल तर त्याला समाजाचे अनेक लोक बघत असतात व नाईलाजाने ही मुलं सुद्धा त्या देवदेवीच्या मानसिक गुलामगिरीत नकळत अडकतात.ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सुख समाधान पैसा गाडी माडी छोकरी नोकरी मिळून देण्यात खूप परिश्रम घेतले, प्रसंगी पत्रकारांची टीका सहन केली. उच्चवर्णीया कडून झालेला अपमान,त्रास,सहन केला. आपल्याकरता त्यांनी आपली चार मुले गमावली.याच उच्चवर्णीयांना आपण आज मदत करीत आहोत.मुला- मुलींच्या लग्नाला,वास्तुशांतीला,सत्यनारायणाला आपण भटजींना बोलविता.त्यांना दान देता,पैसा देता हे लोक आपल्याच पैशावर आपल्या मुलांना उच्चशिक्षित करतात व मोठमोठ्या पदावर रुजू होऊन आपल्या मुलाला बेरोजगार बनवितात.आपल्याच पैशावर ते श्रीमंत होतात. हे सर्व षडयंत्र ओळखून आपण यापासून दूर राहायला पाहिजे.
महात्मा फुलेंनी सामाजिक समतेचा लढा लढला. महात्मा फुलेंना भटाने किती त्रास दिला आहे,हे आपणास माहीत असूनही आपण या षडयंत्राचे बळी होता याचे या महापुरुषांना फार दुःख वाटत असेल.आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांनी आपल्या बहुजन समाजाच्या मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले.प्रशासनात भटा ब्राह्मणांनी 90 ते 95 टक्के जागा बळकावल्या होत्या. याचा सर्वे करून त्यांनी सर्वांना समान वाटा मिळावा म्हणून 26 जुलै 1902 ला आरक्षण लागू केले.आपल्या या बहुजन महापुरुषांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतले.त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही.या महापुरुषांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपण खूप सुख समाधानाने जीवन जगत आहोत. याची आपण बहुजनांनी जाण ठेवली पाहिजे. यापुढे आपण कोणत्याही पुजाऱ्याला दक्षिणा देऊ नये.जे काही द्यायचे असेल ते समाजातील गरीब मुलांना द्या. एखादे मूल दत्तक घेऊन त्यांना शिक्षण द्या.ते जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाहीत. काही लोक अशा प्रकारची मदत करीत आहेत ही एक आनंदाची गोष्ट आहे.तेव्हा आपण सुशिक्षित आहात काय चांगले काय वाईट हे आपल्याला समजते हे आम्हाला माहित आहे.एक वेळ आठवण करून द्यावी त्याकरता एवढा प्रपंच/खटाटोप.महादेव डांबरे:- 9665047153,छत्रपती संभाजीनगर
