
विशेष प्रतिनिधी मुंबई :- बौद्धजन पंचायत समिती या संस्थेचे जेष्ठ,सर्वांचे लाडके आदरणीय बौद्धाचार्य,कवी,श्रामणेर “नारायण रामचंद्र जाधव” यांची प्राण ज्योत मावळली.ते दुख मुक्त झाले.मुंबई शहरातील प्रत्येक झोपडपट्टी ते धम्म प्रचार करण्यासाठी जात होते.माता रमाई वर त्यांनी विशेष प्रवचन मालिका सुरू केली होती. माता रमाई चे गरीबीचे वर्णन त्यांना मान्य नव्हते. ती एक सुभेदारांची सून होती. इतर महार समाजाच्या लोकांपेक्षा त्यांची परिस्थिती वेगळीच असणार. त्यावर त्यांनी बारकाईने अभ्यास करून माता रमाई ही प्रवचन मालिका बनविली होती.वर्षावासा निमित्ताने माता रमाई यांच्या जीवनातील घटनाचा अभ्यास करून त्यांनी तो एक वेगळ्या पद्धतीने सांगत असत.माता रमाईने ज्या परिस्थितीत भीमराव आंबेडकर यांना समजून घेऊन मदत सहकार्य केले आणि संसार केला. ही प्रत्येक महिलेने समजून घेऊन नवऱ्याला मदत केली तर डॉ.बाबासाहेबांची क्रांतिकारी विचारांचे चळवळ वेगळ्या गतीने पुढे गेली असती.असे अनेक उदाहरण देऊन ते रमाई सांगत होते.
ज्येष्ठ बौद्धाचार्य दैनिक सम्राट हितचिंतक धम्म प्रचारक नारायण रामचंद्र जाधव यांचे बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. त्यांना ब्रेन स्टॉक आल्याने पार्ले येथील नित्यानंद रुग्णालयातील ३ जून रोजी भरती करण्यात आले होते. आज ११ जून ला दुपारी त्यांच्या तब्येत अचानक बिघडल्याने त्यातच त्यांचे दुखद निधन झाले.ते ७९ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,दोन मुली असा परिवार आहे.सहारगाव,अंधेरी पूर्व येथे राहत होते.12 जून रोजी त्यांच्यावर अंधेरी येथील स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. बौद्धाचार्य नारायण रामचंद्र जाधव हे दैनिक सम्राटचे खंबीर पुरस्कर्ते होते.दैनिक सम्राटच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला ते दरवर्षी पत्नीसह उपस्थित राहत होते.त्यावेळी ते सम्राटला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या राज्यभरातील सम्राट प्रेमी वाचकांना सुजाता खिरचे वाटप करत असत. यावर्षी दैनिक सम्राट वर्धापन दिन वानखडे स्टेडियम हॉलमध्ये झाला असता त्यावेळी ही पती-पत्नीस आवर्जून उपस्थित होते.त्यावेळी ही त्यांनी सम्राट वाचकांना खीर वाटप केली होती.
अंधेरी ते बोरिवली,विलेपार्ले,खार ते बांद्रा या परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाशांच्या प्रत्येक जन आंदोलनात ते कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहत होते.मी या परिसरात नोकरी करत असतांना कुठे ही असलो की आवर्जून भेटण्यासाठी येत होते आणि स्थानिक बौद्धजन पंचायत समिती शाखा पदाधिकारी यांची ओळख करून देत होते.त्यांना मैत्री जुळवून मैत्री भावना वाढवण्याची विशेष आवड होती. असे बौद्धाचार्य आजच्या घडीला भेटणे अशक्य आहे.बौद्धाचार्य जाधव गुरुजींना अखेरचा निरोप देताना त्यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी लक्षवेधी आठवणी डोळ्यासमोर येतात.कवी,श्रामणेर,भीम सैनिक धम्म प्रचारक नारायण रामचंद्र जाधव यांना श्रद्धांजली अर्पित करतांना,त्यांचे कार्य आणि समाजसेवेची आवड,बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारात त्यांनी जो ठसा निर्माण करून ठेवला तो सर्वांना प्रेरणादायी असणार आहे. बौद्धाचार्य,कवी,श्रामणेर धम्म प्रचारक “नारायण रामचंद्र जाधव” यांना माझ्या परिवाराच्या व सर्व संघटनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडुप मुंबई.