मृत्यूचे दुःख सर्वांना समान आहे.

बातमी शेअर करा.

गुजरात विमान दुर्घटना ही मुंब्रा रेल्वे अपघाता नंतरची दुसरी आपत्ती आहे.सर्व भारतीयांना समान राष्ट्रीय दुःखात लोटणारी आहे.आमचे देशबांधव हे आमच्याच मानवी चुकांमुळे मृत्युमुखी पडतात? तेव्हा सार्वजनिक रित्या दुःख व्यक्त होणे ही आपल्यातील बंधुत्वाची राष्ट्रीय भावना होय.सारे जगच आता सोशल मीडियाने जोडले आहे.या दुःखद घटनांबद्दल साऱ्या जगभरातून समान दुःख व्यक्त होणे ही जागतिक मानवतेची साक्ष आहे.माणसाच्या मृत्यूचे दुःख सर्वांनाच समान आहे.मग ते रेल्वे प्रवाशांचे असो,की विमानात प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांचे असो.एरवी विषमतेचे समर्थन करणाऱ्या,तशा विचारधारा जगणाऱ्या राजकीय पक्ष,धर्म, पंथ,वर्ण,जाती,पुरुष,स्त्रिया या सर्वांनाच मृत्यू दुःखाची समानता शिकवितो.मृत्यूनंतर काही क्षण आम्ही जो अनुभव घेतो. यास आपल्याकडे “स्मशान वैराग्य” हा शब्द प्रचलित झाला आहे.मी हाच शब्द जीवनाचे मनन,चिंतन,ध्यान या अर्थाने घेत आहे.

माझे,तुमचे सर्वांचेच जीवन अमूल्य आहे.ते जपणे हे महत्वाचे आहे.पूर,भूकंप,आग, रस्त्यावरचे,समुद्रावरचे,आकाशातले अचानक घडणारे अपघात,यात आपले ध्येय सर्वांचे प्राण वाचविणे,असेच असले पाहिजे.अर्थात आमच्या जगण्यात सर्वांच्याच जीवनाबद्दल संवेदना असली पाहिजे. करुणा असली पाहिजे.जेव्हा जेव्हा अपघात घडतात. तेव्हा तेव्हा त्यातील मानवी चुका शोधणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे.त्यावर उपाय शोधून कुशलतेने आपले व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन जगणे.ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.केळी खाल्ली की साल रस्त्यावर टाकू नये.असे संस्कार आपल्याला अपघात घडू नये म्हणून घ्यायची काळजी शिकवतात.या लेखात माझे सहज सोपे तत्व मी सांगतो आहे.बैलगाडी बनविणारा,चारचाकी,रेल्वे,विमान,समुद्री जहाज बनविणारा ते झोपडी पासून १०० मजली इमारती बांधणारा या सर्वांनी या बांधकामात जीव सुरक्षेचे हे तत्व समजून घेऊन आपले कुशल कर्म,कौशल्य जपले पाहिजे. जगले पाहिजे.यानुसार चतुर्थ श्रेणी कामगार ते पायलट यात आपणास फरक करता येत नाही.एरवी रेल्वे पटरी दुरुस्त करणारा कंत्राटी कामगार हजारोंचे जीव वाचवणारा आहे. असे समजून त्याचा पायलट इतका सन्मान आम्ही करतो का?.आमच्या मनामनात विषमतेचे तत्व भरलेले आहे.

   छत्रपती शिवरायांसारखे यशस्वी संघटक हे घोड्याची नाळ बसविणारा ते स्वराज्याचा सेनापती आणि अष्ट प्रधान मंडल यांच्यात समानतेने वागत होते. म्हणूनच अफजल खान मोहीम,शाहिस्तेखान मोहीम,आग्र्याहून सुटका यातून ते स्वतःच्या जीवितासाहित मावळ्यांचे प्राणही वाचवू शकले.वर्तमान हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना हे पटेल का? इतरांबद्दल अगदी शत्रू बद्दल ही द्वेष भावना घेऊन जीवनाची लढाई जिंकता येत नाही.बॉर्डर चित्रपटात भाई सनी देओल सांगतात.”लढाई मर कर नहीं जीती जाती? खुद को बचाकर जीती जाती है!”

   छत्रपती शिवरायांचे जीवन समजून घेताना एका पुस्तकात कॅप्टन राजा लिमये सांगतात.”छत्रपती शिवरायांनी एकूण लढाया पैकी ६० टक्के लढाया ह्या रक्त न सांडता जिंकल्या.माझ्या मते ही मानवता आहे.अगदी युद्धातली सुद्धा. “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” सामान्य माणसाच्या जीवनाचे हे वर्णन संत तुकाराम महाराज करतात. आंघोळ करताना बाथरूम मध्ये पाय घसरून पडणारे अनेक लोक आहेत.अर्थात भरपूर सूर्य प्रकाश बाथरुम मध्ये आला तर चिकटपणा,निसरडे पणा टाळता येतो.हे माझे निरीक्षण आणि अनुभव आहे.

    तुमचे जीवन अमूल्य आहे बंधू आणि भगिनींनो.ते जागरूकतेने,सावधपणे,सुरक्षित पणे जगूया.मृत्यू आणि एकूणच मानवी दुःखात समानता आहे.ती संविधानातही आहे.मग मनुस्मृतीच्या विषमतेला नाकारणे हा मानवी धर्म नाही का.जीवन सर्वांचेच अमूल्य आहे.ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र यांचेही.मग.हा देश सर्व शक्तिमान घडवायचा असेल ? तर असे रस्ते,अशी वाहने,अशी विमाने,अशा बोटी आणि अशा सायकली बनवूया ,ज्या येणाऱ्या आमच्या मुलांना जीवनाची सुरक्षा देतील.सैनिकी कारवाई छत्रपती शिवरायांच्या नीतीने करूया. जेथे सामान्य स्त्रिया मुले वृद्ध,रयत सुखी आहे.रयतेच्या भाजीच्या देठाला हात लाऊ नका.हा छत्रपतींचा विचार मुंबईच्या झोपडपट्ट्या,कोळीवाडे एसआरए,बिल्डर,सिडको,एम एम आरडीए या बुलडोझरवादी लोकांच्या हाती देणाऱ्या कोणत्या राजकीय नेत्यांमध्ये,राजकीय पक्षांमध्ये माझा रयतेचा शिवबा,संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बुद्ध,महावीर चार्वाक,सावित्री माता होळकर दिसते का?.आपल्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.लोकशाही आहे.व्यक्त व्हा.भारतीय बंधू आणि भगिनींनो.

राजाराम पाटील.८२८६०३१४६३,उरण रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *