नोकरीच्या संधी विपुल ; विद्यार्थ्यांकडे हवे ‘स्किल आणि विल’ – शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रदीप रोडे

बातमी शेअर करा.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : नालंदा फाऊंडेशन, बीड व आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाईत रविवार, दिनांक १५ जुन २०२५ रोजी शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात निःशुल्क करिअर गाईडन्स सेमिनार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गुणवंतांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता १० वी, १२ वी, पदविका व पदवीनंतर पुढे काय ? असा प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. अशावेळी आपल्या पाल्याला व आपल्या स्वतःला जर निःशुल्क करिअर गाईडन्स सेमिनार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले तर किती बरे होईल. म्हणून हाच विधायक हेतू व सकारात्मक विचार करून नालंदा फाऊंडेशन, बीड व आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाईत निःशुल्क करिअर गाईडन्स सेमिनार व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण सर्वंकष कामगिरी करीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रदिप रोडे (संस्थापक, नालंदा फांऊडेशन, बीड.) हे होते. तर यावेळी विचारमंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे (कृषी महाविद्यालय, लातूर) आणि प्रभावी करिअर मार्गदर्शक म्हणून सर नागेश जोंधळे (संस्थापक, आई सेंटर प्रो तथा प्रेरणादायी वक्ते) तसेच यावेळी राजेंद्र घोडके (सामाजिक कार्यकर्ते), विधीज्ञ व कायदेशीर सल्लागार ऍड.राहुल बनसोडे (नाशिक), प्रा.राम गायकवाड (बीड) या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करण्यात आले.

सुरूवातीला डॉ.विकास वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे आयोजकांकडून स्वागत करण्यात आले. तर मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान – २०२५ पुरस्कार जगन सरवदे (सामाजिक), रणजित डांगे (पत्रकारिता), सर नागेश जोंधळे (लीडरशिप व नेशन बिल्डिंग), डॉ.किर्तीराज लोणारे आणि प्राचार्या स्वाती त्रिशोक वाकळे (शिक्षण), प्रा.सुनिल वाघमारे व सुमित खोत (माहिती तंत्रज्ञान) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. सोबतच ‘द आयडीयल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’ चे मानकरी सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे (कृषी महाविद्यालय अंबाजोगाई येथील परिसरात ३० हजार वृक्ष लागवडीकरीता), कु.श्रेया पुनम ढोले (एक लाख इंग्रजी वाक्य लिहील्याबद्दल), पंकज भटकर यांनी धम्म लिपीतील स्व:हस्ताक्षरात व कोरीव काम करून तयार केलेले भारतातील प्रथमच घराचे नांव फलक करण्याचा विक्रम केल्याबद्दल. आणि आय ई सेंटर प्रो या संस्थेने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२४ रोजी विश्वविक्रमवीर लेखक सर नागेश जोंधळे यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वात ‘भारतीय संविधान भान आणि सामाजिक जाण’ या देशभक्तीचा अभिनव उपक्रमातून मानवी साखळी करून भारतीय संविधानातील मूळ ३९५ कलमांचे फलक तयार करून व त्याचे मानवी साखळी करून वाचन करून विविधतेत एकात्मतेचा संदेश दिला त्याबद्दल गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.

यावेळी पुढील विद्यार्थ्यांना आई सेंटर प्रो-चॅम्पियन इन मी-पुरस्कार देण्यात आले. यातील विजेते सान्वी गुट्टे (प्रथम), विश्वेश्वरी सरदेशमुख (द्वितीय), श्रेयश तिडके (तृतीय) तसेच पंकजा काळे, गीतांजली केंद्रे, आदिल शेख, आशिष साखरे, योगश्री म्हेत्रे, शिवतेज अंजान, द्रोण जाधव हे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले. तसेच आई सेंटर प्रो-द डायनॅमिक कम्युनिकेटर आत्मविश्वासाने आणि अस्खलितपणे इंग्रजी बोलण्याचे ३१ दिवसांचे आव्हान लिलया पार पाडणारे विजेते – माहेश्वरी सरदेशमुख (प्रथम), समर्थ साखरे (द्वितीय), हुजैफ शेख (तृतीय) तसेच उझैर शेख, नयन जाधव, बलराज गायकवाड, अर्णवी केंद्रे, मनस्वी वाघमारे, जयंत वाघमारे, सोहम अंबड, विश्वेश्वरी सरदेशमुख, सोनम सानप, आदर्श वाघमारे, अमृता जाधव, स्वराज जावळे, वैशाखी चोपडे, आदिश्री बिराजदार, प्रथमेश झिटे, श्रीरंग तिडके हे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना शिक्षणतज्ज्ञ प्रा.प्रदीप रोडे म्हणाले की, विद्यार्थ्यांना करिअर विषयी योग्य मार्गदर्शन, माहिती मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश व विधायक हेतू आहे.

अंबाजोगाई हे मराठवाड्याचे पुणे आहे. पाल्यांसाठी पालकांनी काय करावे, मुलांवर आपली मतं, इच्छा, अपेक्षा थोपू नयेत, पाल्याचा कल ओळखा, नवे बदल स्विकारा, परकीय भाषा अवगत करा, मोबाईलचा अतिवापर टाळावा, मुलांच्या हातात पुस्तक द्या, मुलांची इतरांबरोबरची तुलना टाळा, परदेशात नौकरीच्या संधी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘स्कील (Skill) आणि वील (Will)’ आत्मसात करावे यासाठी शिक्षण व नौकरी उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात नालंदा फौंडेशन कौतुकास्पद कार्य करीत आहे असे शिक्षणतज्ज्ञ प्रा.रोडे यांनी सांगितले. सुरूवातीला सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.ठोंबरे यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना थ्री डी – समर्पण (डेडीकेशन), दृढनिश्चय (डिटरमिनेशन) आणि एकनिष्ठपणा (डिवोशन) या त्रिसुचीचा वापर करून मोठे यश संपादन करता येते असे अधोरेखित केले. तर सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, आवडीचे करिअर निवडण्यासाठी पालकांनी मुलांशी सुसंवाद साधावा, संधी द्यावी, पालकांनी स्वतःचे स्वप्न मुलांवर थोपू नये, हसत-खेळत त्यांच्यातील कला-गुणांना वाव द्यावा, आज जागतिक स्पर्धेत तसेच संगणकीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, फॅशन डिझायनिंग, उद्योजकता या मानसिकतेतून उत्तुंग यश मिळवण्यासाठी घरात पोषक असे वातावरण ठेवत संवादयुक्त करिअर निवडण्यासाठी संधी द्यावी असे मत करियर मार्गदर्शक तथा प्रेरणादायी वक्ते सर जोंधळे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.विकास वाघमारे यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.राहुल सुरवसे यांनी करून उपस्थितांचे आभार डॉ.किर्तीराज लोणारे यांनी मानले. तर सोमनाथ विभुते, ऍड.दिलीप गोरे, गायक बळीराम उपाडे, धम्मदीप वैद्य, आकाश वेडे, नितीन सरवदे, दत्ता घोडके, आई सेंटरचे जयश्री समसे, शंकर समसे, साक्षी कराड, मोहिनी गडकर, यश इंगळे, आदर्श वाघमारे, आदित्य काळे, मुक्ताराम कराड, सुशिल गडकर व सर्व फॅमिली मेंबर्स यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर, तालुका व पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणारे सजग नागरिक, पालक, विद्यार्थी – विद्यार्थीनी यांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त असा प्रतिसाद व उपस्थिती होती. यावेळी शहरी तथा ग्रामीण भागातील इयत्ता दहावी – बारावीतील २०० गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थीनी तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशवंतांचा ग्रंथ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रथमच एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपल्या पाल्यांना कौतुकाची थाप मिळत असताना पाहण्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होता. काही पालक व विद्यार्थ्यांचे तर त्यांना मिळालेल्या सन्मानाने व कौतुकाने आनंद आश्रू अनावर झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संयोजक, सर्व सन्माननीय सदस्य नालंदा फाऊंडेशन, बीड व आई फाऊंडेशन, अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *