
काल एका आंबेडकरी समाजाच्या सामाजिक कार्यक्रमातून प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांना भाषण करण्यापासून आंबेडकरी समाजाने रोखले.ज्यांनी त्यांना आमंत्रित केले होते त्यांना ही तुम्हाला जनतेचा विरोध आहे हे सांगून थांबण्यास सांगितले गेले,त्या नंतर मुंबई उच्च न्यायालयातील एका वकील महिलेने त्यांच्या समर्थनार्थ एक लेख लिहिला.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात स्वतःच्या प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन त्यांना बंदी असताना ही 22 जिल्ह्यातून वेषांतर करून त्यांनी कशी भाषणे दिली हे ही सांगितले,आणि विरोध करणारे हे अजून अंड्यातून बाहेर येणारी पिल्ले आहेत,त्यांना सरांचा त्याग माहीत नाही अस बरच कांहीं.
हाच प्रश्न दलीत पँथर संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ (गोल पिठा) तसेच केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले ते आनंदराज यांच्या प्रति ही विचारले गेले.मी शक्यतो चळवळीच्या नेत्यावर भास्य करणे टाळतो.याचे कारण यातच दडलेले असते की तुम्ही कोण? तुमची योग्यता काय ? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.काल परवा पर्यंत संघ भाजपा,शिवसेना यांचे हिंदुत्व या कडे महाराष्ट्रातील जनता लोकशाहीतील सामान्य पक्षीय राजकारण म्हणून पाहत होती,स्थानिक राजकारणातील परिस्थिती ते राज्य पातळीवरील स्थिती,पाहून प्रत्येक व्यक्ती ही आपल्या राजकीय सोयी ने निर्णय घेत होती.दलित पँथर निर्मिती चे काळात दलित पँथर विरूध्द शिवसेना हा संघर्ष व्यापक प्रमाणात अस्तित्वात होता,याचे कारण प्रबोधन कार ठाकरे हे हिंदू मधील सुधारणा वादी होते पण हिंदू धर्माच्या चौकटीत राहून त्यांना ब्राम्हणी वर्चस्वाला सुरुंग लावायचा होता.
हिंदू हृदय सम्राट कै.बाळासाहेब ठाकरे यांनी ती ही वाट सोडून दिली आणि भाजप समवेत युती करून ब्राम्हणी वर्चस्वाचा अजेंडा बाजूला ठेवला.प्रस्थापित काँग्रेस पक्षाचा आधार असलेली बहुतांश नेतृत्व ही “मराठा” या प्रभुत्वशाली जातीतून निर्माण झालेली आणि त्यांच्या हातात असलेला ग्रामीण भागातील सहकार याच्या आधारे सामाजिक, राजकीय,आर्थिक शक्ती केंद्रित असलेली होती,आणि काँग्रेस चे धोरणा नुसार किंवा तिच्या गुण वैशिष्ठ्य ज्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर (hetrogenies body) म्हणायचे.“काँग्रेस हे जळते घर आहे”! असे ते म्हणत,याचे कारण त्याचे स्ट्रकचर,हेट्रोजिनियस याचा अर्थ मराठीत होतो, परस्पर विरोधी हितसंबंध असलेल्या वर्गाची टोळी.म्हणजे ज्यात गरीब,श्रीमंत,मागास वर्गीय ते उच्च वर्णीय,कारखानदार,भांडवल दार ते श्रमिक अश्या सर्वांचा एकत्रित असलेला गठ्ठा.यांच्यात असलेले परस्पर संबंध, अंतर्विरोध यामुळे हे घटक एकमेकाच्या विरोधात लढतील आणि काँग्रेस चे अस्तित्व या मुळे आपोआप विघटित होईल.अश्या मातब्बर घराणेशाहीला राजकीय दृष्ट्या कुम कुवत करण्याचा मार्ग धार्मिक अस्मिता जागृत करण्यातून पुढे सरकला.गैर आंबेडकरवादी मागास वर्गीय,ते ओबीसी पर्यंत चां वर्ग हिंदुत्वाच्या पंखा खाली एकवटताना त्याचा आधार हा आंबेडकरी चळवळीने सुरू केलेला हिंदू धर्म चिकित्सा सांस्कृतिक चळवळ,व त्या आधारे केलेल्या देवतांच्या वरील टीपण्या यांनी 1972 सालचे “मार्मिक” तपासले तरी ही बाब लक्षात येईल.महाराष्ट्रात जो सामाजिक ताण तणाव निर्माण झाला तो याच काळात,दलीत,मुस्लिम हे आपोआप प्रस्थापितांच्या वळचणीला गेले.तरी ही बहुसंख्य समाज धर्माच्या आधारे तिकडे शिफ्ट झाला आणि ग्रामीण घराणे शाहीला कमजोर करत ओबीसी मधील नव नेतृत्व निर्माण झाले,जसे की दिंवंगत नेते गोपीनाथ मुंडे,भाजप,शिवसेना सारख्या पक्षाचे स्थानिक नेते ओबीसी समूहातील असल्याने आणि त्यांचा विरोध हा पुढे प्रास्थापित नेत्यांशी सुरू झाला.
हे सामाजिक अभिसरण इतक्या वेगाने झाले की,त्याची एलर्जी आंबेडकरवादी समाजाची ही संपली,भाजपा शिवसेना समवेत काम करणे हा राजकीय सोयीचा भाग बनला.”शिव शक्ती ~भीम शक्ती”सारखे प्रयोग सुरू झाले.पद्मश्री नामदेव ढसाळ हे त्यांच्याच पँथर चळवळी पासून बाजूला फेकले गेले होते, आणि प्रा.अरुण कांबळे यांनी ही जनता दल सारख्या प्रयोगातून संसदीय राजकारणात उडी घेतल्या नंतर रामदास आठवले यांच्या कडे चळवळीची धुरा आली, नामांतर प्रक्रिया पार पडल्या नंतर सत्ता निर्मितीसाठी रीप ऐक्याचे प्रयोग सुरू झाले आणि काँग्रेस,पक्षा समवेत राजकीय आघाडी करून चार खासदार ही झाले.आंबेडकरी समाजाला पक्षीय राजकारणाची चटक लागली.

आपण एक झालो तर कोणत्याही राजकीय पक्षाशी तडजोड (युती किंवा आघाडी) करून आपण सत्ता प्राप्त करू शकतो असा विश्वास त्यांना वाटू लागला.उत्तर प्रदेशात मान्यवर कांशीराम यांनी जाती अंता ऐवजी जातीची सत्ता भागीदारी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली.“जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” हे सूत्र त्यांनी घेतले.पण ते घेण्यापूर्वी त्यांचे मजबूत संघटन होते,आणि हजारो प्रचारक मिशन म्हणून राबत होती,त्यांनी बहुजन सत्तेचा पाया घातला.प्रत्यक्षात ही सत्ता प्राप्त करण्यासाठी निवडणुकी नंतर ज्या संधी आघाडी करून मिळवता आल्या त्या त्यांनी मिळवल्या “संधी नाकारलेल्या बहुजनांची सत्ता स्थापित करताना त्या जिथे असतील त्यांना आम्ही स्वीकारून सत्ता मिळवू” हा साधा सिद्धांत त्यांनी स्विकारला आणि त्या साठी भाजप सारख्या पक्षाला ही त्यांनी आपल्या सोयीने वापरले.आत्ता प्रत्यक्षात कुणी कुणाला वापरले ? हा भाग स्व निरीक्षणाचा आहे.त्याच उत्तर प्रदेशात आज “योगी” सत्तेचा बुलडोझर घेऊन फिरत आहेत,जिथे बहुजनांची सत्ता चार चार वेळा थेट मुंख्यमंत्री पद मिळवून स्थापित झाली होती.
सामाजिक जातीय विषमतावादी उतरंड जिथे अस्तित्वात असते तिथे जाती व्यवस्था ही एक दुसऱ्याशी इर्षा आणि द्वेष करत राहते,आणि याच सुप्त भावनेचा आधार उच वर्णीय घेऊन बहुजनांना कमजोर तर स्वतःला मजबूत बनवतात.
महाराष्ट्रात आंबेडकरी समाज हा हिंदू बहुल समाजापासून वेगळा पडलेला समाज आहे,त्यांची धार्मिक ओळख ही बौद्ध म्हणून स्थापित होत आहे.या अर्थाने तो अल्पसंख्यांक आहे,पण त्यांचा सामाजिक दर्जा अजून ही पूर्वाश्रमीचा मागास हाच आहे.गैर आंबेडकरी मागास वर्गीय,इतर मागास वर्गीय,भटके विमुक्त असा कोणताही समाज हा “हिंदुत्वाच्या” अंतर्गत स्वतःचे स्थान शोधतो,त्या साठी तो त्या अंतर्गत संघर्ष ही करतो,आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना,त्यांच्या पक्षीय नेत्यांना तो नेता म्हणून स्वीकारत नाही (अपवाद सोडून) हे वास्तव समजून घेतले तर आंबेडकरी पक्ष नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात येतात. रिपाई ऐक्याने किंवा नवबौध्द समाजाच्या समग्र एकी द्वारे ही या प्रश्नाची सोडवणूक होत नाही.आणि होणार ही नाही,एकूण समाज व्यवस्थेतील नवबौध्द समाजाचा लोकसंख्या चां टक्का हा यातील महत्वाचा भाग आहे. स्वतंत्र मतदार संघाचे अस्तित्व जेंव्हा पुणे कराराने संपुष्टात आले आणि संयुक्तिक मतदार संघ अस्तित्वात आले तेंव्हाच हे नीच्छित झाले होते.याच रचनेचा फटका थेट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ही पराभूत होऊन बसला.तिथे इतरांची काय कथा?संसदीय राजकारणात सत्ता प्राप्त करायची असेल तर आपल्याला इतर प्रस्थापित पक्षाचे समवेत जावे लागेल हे उमजल्याने कोण काँग्रेस समवेत,आणि नंतर प्रत्येकाच्या सोयी ने शिवसेना ते भाजपा असा राजकीय प्रवास सुरू केला.हे वास्तव समजून घेतले पाहिजे.
दुसऱ्या बाजूने आम्ही पक्ष म्हणून स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवू म्हणून आंबेडकरी अस्मितेला जागृत ठेऊन वंचित सारखे राजकीय प्रयोग ही चालू आहेत.याचा परिणाम म्हणून दोन प्रस्थापित राजकीय पक्षतील कुणाचा तरी विजय किंवा कुणाचा तरी पराभव होतो तेंव्हा मूलतः आंबेडकरी समाज म्हणजे पुरोगामी समाज,हिंदुत्व विरोधी अशी तिची प्रतिमा,ती मते भाजप विरोधी पारड्यात गेली असती हे गृहीत धरून वंचित वर भाजपला सत्ता पूरक असल्याचा आरोप केला जातो.इथे हाच प्रश्न आमच्या सारख्यांच्या ही मनात निर्माण होतो की गाव कुसातील प्रस्थापित पक्ष हे विजयी होतील किंवा पराभूत होऊन प्रस्थापित पक्षातच सत्तेचा फेर पालट होईल.पण आमच्या पदरात याने काय पडणार ?
“मार्क्स वाद विरूध्द बुध्दीझम” यातील डिबेट ने आंबेडकरी चळवळीने मार्क्स वादाला शत्रू मानले.शत्रू कोण होता ? शोषक की शोषितांच्या बाजूने लढाई करणारा विचार?थे फक्त मतभेद होता तो क्रांती सशस्त्र उठावाने की लोकशाही शांततामय मार्गाने? मार्ग वेगळे म्हणून आपण मार्क्स वादाला शत्रू मानले.काँग्रेस जळते घर म्हणून काँग्रेस नाकारली (तिच्यातील अंतर्गत विरोधाने स्वतः नष्ट होणारी) त्याच काँग्रेस चे व घटना दत्त धर्म निरपेक्षता तत्वज्ञान फेटाळून लावत धार्मिक अस्मिता जागृत करून एक धर्मीय वर्ण व्यवस्था प्रणित धार्मिक राष्ट्र उभारणी हे ध्येय मानणाऱ्या कडव्या विचारसरणीचा राजकीय आश्रय घेऊन आंबेडकरी चळवळ तिचे वैचारिक स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकेल काय? असे अनेक गंभीर प्रश्न आज समाजाच्या समोर आहेत.एक जातीय मजबूत पक्षीय संघटन हा एकमेव पर्याय स्वतंत्र राजकीय वाटचाल ठेऊन आपण सत्ता प्राप्ती पर्यंत पोहचू शकू काय? संयुक्त मतदार संघ रचने मुळे निर्माण झालेली राजकीय रचना व यातील उभरते नेतृत्व म्हणून उभे राहू इच्छिणाऱ्या नवबौध्द समाजाचे नेतृत्व प्रस्थापित जात दांडगे,धन दांडगे, स्वीकारतील काय? हे ज्याने त्याने आत्म परीक्षण करून शोधावे!
आंबेडकरी चळवळ अप्रामाणिक होती,चळवळीचे नेते अप्रामाणिक होते म्हणून अपयश येते हा गैर समज आहे.सामाजिक वास्तव,संयुक्त मतदार संघ निर्मिती, आंबेडकर वादाचा सार्वत्रिक स्वीकार करण्यास तयार नसलेली इतर समाजाची धर्मियांची मानसिकता,नवबौध्द समाजाचा सामाजिक दर्जा अश्या अनेक बाबी ही हतबलता निर्माण करतात.प्राप्त परिस्थितीत स्वतःला,स्वतःच्या पिढ्यांना राजकीय दृष्ट्या स्थिर करण्याच्या भूमिकेतून नेतृत्व हतबल होऊन प्रस्थापित सत्तेला शरण जाणे पसंत करतात.
चीन मध्ये एक म्हण आहे. “झाडे शेंड्या कडून वाळतात” उच्च पदस्थ नेत्यांनी केलेल्या तडजोडी खाली पाझरत जातात आणि तोच व्यवहार सर्वश्रुत राजकीय व्यवहार म्हणून स्थापित होतो.!
आपल्याला आपला शत्रू आणि मित्र ओळखता येत नाहीत.त्या मुळेच लोकशाही व भारतीय राज्य घटना यावर संघ व संघप्रणीत शासन व्यवस्था स्थापित झालेली असताना,लाल किल्ल्यावरून संघाचे गोडवे गायले जात असताना ही त्यांना थोपवण्याची शक्ती आपल्या एकाकी चळवळीत व पक्षात राहिलेली नाही.आपण व्यवस्थेने केलेल्या अन्यायाच्या विरोधात त्याच व्यवस्थेकडे न्याय मागत आहोत. भारतीय लोकशाहीचे आणि राज्य घटनेचे रक्षण प्रस्थापित व्यवस्थेतील न्यायालयीन व्यवस्थेने करावे याची कामना करत आहोत.
बाबरी मशीद प्रकरणात रंजन गोगाई यांनी त्यांचे काय समाधान केले हा इतिहास ताजा आहे.मालेगाव बॉम्ब स्फोट केस चां निकाल हेच दर्शवतो.ही हतबलता संपवायची असेल तर किमान बेटर मित्र निवडावे लागतील नाही तर ही हतबलता चळवळ व पक्षीय स्तरावर कायमची राहील.तूर्त इतकेच ,,,
!ऍड.अविनाश टी काले,मो.न-9960178213,अकलूज
डॉ.आंबेडकर चौक,तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर

