आठ वर्षे वयाच्या विशाखाची जागृती व आपण. 

बातमी शेअर करा.

बहुधा मे महिन्याचा पहिला आठवडा असावा.मित्रवर्य धम्मशील भोंगाडे यांना भेटायला गेलो होतो.भोंगाडे साहेबांना फोन केला असता ते म्हणाले कि, ‘तुम्ही घरी जा आणि चहापाणी घ्या.तोपर्यंत मी येतो.’ त्याप्रमाणे मी गेलो असता त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीने – विशाखाने – दार उघडले व पटकन घरात निघून गेली. वहिनींनी चहापाणी दिला,एवढ्यात भोंगाडे आले. त्यांना बघताच विशाखा हर्षवायू झाल्यागत धावत आली व पप्पांना बिलगून आनंदाने म्हणाली, “पप्पा ! आय हॅव गॅाट फर्स्ट रॅंक !!” हे ऐकताच पप्पा खूष झाले.आनंदाने लाडक्या मुलीला उचलून घेतले व तिला गोंजारीत म्हणाले, ‘माय स्वीट प्रिन्सेस ! यू आर सो वंडरफुल !!’ 

पण विशाखा यांवर समाधानी नव्हती. “नो नो, पप्पा ! आय वॅान्ट न्यू ड्रेस, न्यू स्कूल बॅग, न्यू अंब्रेला, न्यू शूज ॲंड सॅाक्स ॲंड ॲाल न्यू बुक्स !” 

यांवर पप्पा म्हणाले, ‘येस बेटा ! पगार झाल्यावर तुला मार्केटमध्ये घेऊन जाऊ आणि सगळं काही घेऊ !” पण विशाखा हुशार होती. तिने हात पुढे करून पुन्हा विचारले, “प्रॅामिस, पप्पा !” पप्पांनी देखील प्रॅामिस म्हणून हातावर हात दिला, तिच्या चिमुकल्या हाताची पापी घेतली व म्हणाले, ‘प्रिन्सेस ! आता खेळायला जा,घरी माझे मित्र आलेत ना, आम्हाला त्रास देऊ नकोस !’ पप्पांनी प्रॅामिस देताच कळी खुललेली विशाखा अत्यानंदाने खेळायला गेली. मग वहिनी सांगू लागल्या कि, ‘सकाळी रिजल्ट लागल्यापासून सारखी पप्पांची वाट बघतेय. कधी एकदा पप्पांना रिजल्ट सांगेल व प्रॅामिस घेईल, असे तिला झाले होते. आता तिच्या मनासारखे झाले एकदाचे !’ मग आम्ही दोन्ही मित्र सामाजिक चर्चा करू लागलो, जयंतीच्या कार्यक्रमाचे अनुभव सांगू लागलो, काही नियोजनही करू लागलो. चर्चा संपल्यावर मी निघून आलो. 

     पुढे जून महिना आला व भोंगाडे साहेबांचा पगार झाला. पगार झाल्याबरोबर विशाखाने सारखी भुणभुण लावली; न्यू ड्रेस , न्यू स्कूल बॅग, न्यू शूज वगैरे वगैरे. एवढे सगळे झाल्यावर पप्पांना प्रॅामिसची आठवण देखील करून द्यायची. पप्पा देखील हो म्हणायचे,पण पगार झाल्यावर पप्पांच्या मागे हजार खर्च असतात.घराचा हप्ता, किराणा माल, गावी पैसे पाठवणे असे ठोकळ खर्च झाल्यावर,पप्पा एकदाचे मुलीला घेऊन मार्केटमध्ये जातात, तिला काय हवे ते घेऊन देतात. 

मध्यम वर्गीय कुटुंब आहे. कधी स्कूल बॅग तर कधी छत्री टाळावी लागते, किंवा कधी शूज तर कधी सॅाक्स टाळावे लागतात. परंतु विशाखाच्या बहुतेक मागण्या पूर्ण होतात व ती आनंदाने नव्या इयत्तेत जाते. घरातील शाळकरी मुलांचा रिजल्ट जाहीर झाल्यावर तुमच्या – आमच्या घरात दिसणारे हे सर्वसामान्य दृश्य आहे. “पगार झाल्यावर” आपल्या सगळ्या समस्यांची “उत्तरे” भेटतात. त्यासाठी आपण सगळे जण पगाराची आतुरतेने वाट बघत असतो. 

     आपल्या घरातील पगाराची आतुरतेने वाट बघणारे आपण देशाच्या पगाराची अशी वाट बघतो काय ?.“अर्थसंकल्प म्हणजे देशाचा पगार !” जसे आपल्या वय वर्षे आठ असलेल्या विशाखाला माहित असते कि, जून महिन्याच्या पगारात म्हणजे घराच्या बजेटमध्ये ‘माझा हिस्सा’ आहे तसे देशाच्या पगारात म्हणजे बजेटमध्ये “माझा हिस्सा” आहे, हे आपल्यापैकी किती जणांना माहित आहे ? 

विशाखाचे वय फक्त आठ वर्षे एवढेच आहे. ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे अशा डांगऱ्या खोडांना देखील देशाच्या बजेटमध्ये माझा हिस्सा आहे,हे माहित नसते ! 

आता देशाच्या बजेटमध्ये माझा हिस्सा आहे हे ज्यांना माहितच नाही ते बजेटमधील हिस्सा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील, हेदेखील संभवत नाही.त्यामुळे विशाखा जशी पप्पांच्या मागे भुणभुण लावते तसे सरकारच्या मागे भुणभुण लावायला देखील कोणी जात नाही ! मग सरकार देईल ते पदरात टाकून घ्यायचे व समाधान मानून गप्प बसायचे,असे आपले आयुष्य चालले आहे. त्यामुळे हातावर पोट असणारेच नव्हे तर चांगले पगारदार देखील बजेट आल्यावर इन्कम टॅक्स,रेल्वे भाडे,पेट्रोल डिझेल भाववाढ, गॅसचा भाव याच्या बाहेर जाऊन विचार करीत नाहीत. 

   परिणामी शिक्षण महाग झाले,औषधांवर टॅक्स लावला,कपडे – चपलांवर जीएसटी वाढवला,मोबाईल महागला,गॅसचा भाव वाढला किंवा पेट्रोल – डिझेल महाग झाले तरी सामान्य जनता काही बोलत नाही.याचे मुख्य कारण असे कि,देशाच्या बजेटमध्ये माझा काही वाटा आहे, माझा काही हिस्सा आहे, हे या जनतेला माहितच नाही !. त्यामुळे वय वर्षे आठ असलेल्या विशाखासारखी ती प्रेमाने का होईना परंतु सरकाररुपी पप्पांशी भांडतच नाही ! मग या जनतेच्या आशा – आकांक्षा बजेटमधून कशा काय पूर्ण होणार ?. तर असा हा देशाचा पगार म्हणजेच अर्थसंकल्प तारीख १ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर होणार झाला आहे. तो किती आहे, हे देखील मोठमोठ्या विद्वानांना माहित नसते.मागील वर्षी तो ₹48,000,00/- कोटी (अक्षरी रुपये अठ्ठेचाळीस लाख कोटी फक्त !) एवढा होता ! यावर्षी तो पन्नास लाख कोटी रुपयापेक्षा जास्त होईल ! 

  आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणतो. “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत….” आता सारे भारतीय माझे बांधव आहेत,म्हणजे भारत माझा बाप आहे ! आणि माझ्या बापाचा पगार अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपये एवढा महाप्रचंड आहे !

 लक्षात घ्या, एवढा पगार अगदी अंबानी – अडाणीचा देखील नाही.मग माझ्या बापाचा एवढा पगार असूनही मी गरीब का आहे ?. माझ्या बापाचा एवढा पगार असूनही मी ऐसपैस बंगल्यात किंवा तीन-चार बेडरूम हॅाल किचन अशा फ्लॅटमध्ये राहण्याऐवजी झोपडीत किंवा छोट्याशा खोलीत का राहतो ?.माझ्या बापाचा एवढा पगार असूनही मी बेरोजगार का आहे ?. मला दरमहा पंचवीस – तीस हजार बेरोजगार भत्ता का मिळत नाही ?. माझ्या बापाचा एवढा पगार असूनही मला सरकारी दवाखान्यात मोफत इलाज व औषध का भेटत नाही?. माझ्या बापाचा एवढा पगार असूनही सरकारी शाळांची अवस्था दयनीय कशी काय ?. तर मित्रांनो, या अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच आपणांस आपल्या बापाच्या पगाराचा म्हणजे भारताच्या बजेटचा अभ्यास करायचा आहे. १ फेब्रुवारी रोजी हा आपल्या बापाचा पगार म्हणजे भारताचे बजेट आपण समजून घेतला काय?. घेण्याची इच्छा आहे काय?.चला मग आठ वर्षे वयाच्या विशाखाप्रमाणे आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी आपण सर्व एकत्र भेटू या.

जयभीम !

जय भारत !!

जय संविधान !!!

 शुद्धोदन आहेर 9820172298,मुंबई. 

सामाजिक कार्यकर्ते,बजेट अभ्यासक. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *