
“बाबा,जे काही मी बनवलंय ते शांतपणे खाऊन टाका.रोजच्या रोज तुमचे नखरे सहन करायला मी इथे बसलेली नाहीये…” कविता बडबडतच खोलीतून बाहेर निघून गेली. सकाळच्या नाश्त्याची वेळ होती आणि कविताने थोडीशी करपलेली,कडक पोळी आणि कोरडी भाजी वाढली होती.
कमलेशजींनी फक्त एवढंच म्हटलं होतं, “सूनबाई, या वयात दात साथ देत नाहीत ग, थोडी मऊ पोळी द्यावी ना किंवा दूध द्यावं, त्यात भिजवून खाईन ना ग.”
हे रोजचंच झालं होतं. ताटात खाण्यायोग्य जेवण क्वचितच असायचं. बनावट दात होते आणि पचनसंस्थाही कमजोर झालेली होती,त्यामुळे जर कधी खिचडी,उपमा किंवा काही मऊ पदार्थ मिळाला असता,तर जरा चवही बदलली असती आणि पचनातही आराम मिळाला असता.पण त्यांचं जेवण जणू कुठल्या मुक्या प्राण्यापुढे अन्न टाकल्यासारखं वाढलं जायचं. करणार तरी काय? कमलेशजींनी मुलाच्या आग्रहाखातर गावातलं घर विकून टाकलं होतं आणि त्याच पैशातून शहरातलं हे घर घेतलं होतं. संध्याकाळी फिरायला गेले की पार्कमध्ये त्यांचे काही मित्र भेटायचे, जरा गप्पाटप्पा व्हायच्या.वृद्धत्वातील सुखद आठवणी आणि काळज्या यांचा खेळ चालूच असायचा.
आज कमलेशजी थोडे उदास वाटत होते. रंजन बाबूंनी ते ओळखलं आणि विचारलं, पण कमलेशजींनी तब्येतीचं कारण दिलं. घरातल्या गोष्टी सार्वजनिक करणे म्हणजे स्वतःच्याच घराची बदनामी होती. कोण काय बोलेल, कोण कसं समजून घेईल, ह्याचं काही सांगता येत नव्हतं.त्यांच्या मनात विचार आला “आपल्या संस्कारांवरच प्रश्न उभा राहील… आपण आपल्या मुलांना कसं वाढवलं? की ज्यांना आपल्या बापाचीच काळजी नाही!” औषधं, जेवण सगळं काही त्यांच्याच कृपेवर चाललेलं आहे की..असा विचार करत करतच संध्याकाळी लवकरच ते घरी परतले.रात्री जेवताना मुलाशी काही बोलायचं ठरवलं होतं,पण कविताने मध्येच बोलत म्हटलं, “बाबा,त्यांना तरी शांततेने जेवू द्या.दिवसभर काम करतात ते.” कमलेशजींनी काही न बोलता डोळ्यांत पाणी आणून जेवण केलं आणि आपल्या खोलीत गेले.त्यांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या.ललिता तिच्या हाताने गरम गरम पोळ्या करत असे.प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वयंपाक करत असे.या सुनेला ज्याचे नखरे वाटतात,त्याच मुलासाठी ललिता स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता त्याच्या आवडीची दुसरी भाजी पण करत असे.त्या रात्री त्यांना वाटलं, जणू ललिता त्यांच्याशी बोलत आहे, “तुम्ही गावाला परत जा ओ… रामू (नोकर) तुम्हाला जास्त चांगलं सांभाळेल.” ते विचारात पडले — रोज रोजची ही अपमानाची थाळी खाण्यापेक्षा मृत्यूच चांगला.सकाळ झाली तसं त्यांनी ठामपणे ठरवलं — “जो पर्यंत श्वास आहे, तो पर्यंत सन्मानाने जगावं.”
नाश्ता आला, त्यांनी थाळी डोक्याला लावली आणि म्हणाले, “सूनबाई, हे अन्न परत घेऊन जा.”
कविताने तुच्छतेने विचारलं, “काय झालं? आधी सांगितलं असतं भूक नाहीये तर, उगाच अन्नाची नासाडी नसती ना झाली.”
कमलेशजी म्हणाले, ” सुनबाई इज्जतीची कोरडी भाकरी जास्त चांगली असते ग, बेईज्जतीच्या पकवानांपेक्षा.मी इथून निघून जायचं ठरवलंय.गावाकडे परततोय.जिवंत राहण्याइतका पैसा आहे,आणि जगणं शिल्लक आहे.आज सायंकाळचीच गाडी पकडतोय.”
कविताचा थरकाप उडाला. जर रवी (पती) ला हे कळलं,तर तो तिच्यावर नक्कीच रागावेल.कमलेशजी समजूतदार होते, त्यांनी रवीला फक्त एवढंच सांगितलं — “बेटा, शेताचं काही काम आहे,म्हणून जातोय.आणि एक गोष्ट लक्षात ठेव — नोकरीसोबत वडिलांसाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं असतं बेटा.”
रवी चिंतेत पडला. बाबा अचानक का जात आहेत? दिवसभर त्याचं मन कामात लागलं नाही. त्याने दुसऱ्या दिवशी गावाला जायचं ठरवलं.रात्री घरी येऊन त्याने कविताला सांगितलं, “मी काही दिवस ऑफिसच्या कामासाठी जातोय.”
कविता लगेच म्हणाली, “मग मला पण घेऊन चल,जरा आउटिंग होईल.बाबांनी मला नुसतं बांधून टाकलं होतं इथं त्यांची सेवा करण्यासाठी.. आता सुटले एकदाची बंधनातून..”
रवी बोलला, “बंधन…? बाबांच्या उपस्थितीत काय बंधन होतं? खरं सांग — बाबांनी घर का सोडलं?”
कविता चिडून म्हणाली, “मी कंटाळले होते त्यांच्या नखऱ्यांना. काल तर जेवण सुद्धा परत केलं.”
रवीला सगळं समजलं. तो म्हणाला, “तू एकदा तरी फोन करून सांगायचं होतंस ना की बाबा काहीही न खाता घर सोडून गेलेत. मी उद्या गावाला जातोय.बाबांनी मला काहीच संगीतलं नाही,पण मी त्यांचं मन नक्की जाणून घेईन.”
कविताला पश्चात्ताप झाला.ती म्हणाली, “चूक माझी आहे,मीच सुधारेल.मीही येईन बाबांना परत आणायला.”
दुसऱ्या दिवशी दोघंही गावाला पोहोचले.तेव्हा कमलेशजी शेत विकण्याची तयारी करत होते.कविता त्यांच्या पायावर पडून रडत माफी मागू लागली.रवीही माफी मागू लागला.
कमलेशजी म्हणाले, “बेटा, म्हातारपणात काय लागतय माणसाला — फक्त इज्जतीची भाकरी!! तुमच्या घरात ती पण मिळत नव्हती.म्हणून मी आता ठरवलंय की मी आश्रमात जाईन आणि माझ्या नातवंडांच्या नावावर पैसा ठेवीन. जेणेकरून त्यांना अशी वागणूक मिळणार नाही.”
रवी म्हणाला, “मला काही नको, पण कृपया एक संधी द्या.मी वचन देतो, तुमच्या सन्मानात कधीही कमी पडू देणार नाही.” खूप विनवण्या करून रवी आणि कविताने त्यांना परत घरी आणलं.
सर्वांनी परत एकत्र राहायला सुरुवात केली. कविता आता कमलेशजींच्या सन्मानात कधीच कमी पडत नाही. रवीलाही वडिलांसोबत वेळ घालवायची सवय लागली.
हे खरं आहे — ‘जसं कर्म तसंच फळ’. जे आज आपण आपल्या आई वडिलांशी वागतो, उद्या आपल्यावर परत तीच वेळ येणार .”
संकलन :- सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.