आगरी कोळी गावठाण आणि”हिंदू राष्ट्रवाद?”- राजाराम पाटील.

बातमी शेअर करा.

मुंबईचे मूळ भूमिपुत्र आणि सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी आदिवासी ईस्ट इंडियन यांच्या घरं वस्त्या यांना शासनाने गलिच्छ वस्त्या (SRA) घोषित केले. २०१६ /१७ची ही गोष्ट आहे.त्यावेळी या विरोधात कुणाचीही प्रतिक्रिया नव्हती.याअगोदर एससी एसटी अल्पसंख्याक लोकांच्या वस्त्या झोपडपट्ट्या किंवा गलिच्छ वस्त्या(SRA) शासनाने घोषित केल्या होत्या.त्यांचीही त्यांच्या विरोधी लोकां विरोधात निश्चित प्रतिक्रिया नव्हती.आजही हा लढा मागासवर्गीय विरुद्ध उच्चवर्णीय हिंदू असा मांडला जात नाही.आज जागतिक स्थितीत युद्ध सुरू आहे.त्या युद्धाचे हेतू काय आहेत? अमेरिकेचे म्हणणे काय आहे? इराण का लढतोय? हे सारे विवेक बुद्धी आणि मानवी हक्क लक्षात घेतल्याशिवाय “सत्य “समजत नाही.देशात आज भाजपची सत्ता आहे.राज्यात त्यांचीच सत्ता आहे.स्थानिक स्वराज्य संस्थात भाजपची सत्ता आहे.हिंदुराष्ट्र ही भाजपा संघ परिवाराची जाहीर राष्ट्रीय संकल्पना आहे.
   आगरी कोळी कराडी भंडारी ही ओबीसी मंडळी ५० टक्क्याहूनही अधिक आहे.सोबत एससी एसटी अल्पसंख्याक ही मंडळी देशाच्या एकूण लोकसंख्येत ८५टक्के होते.हिंदू राष्ट्रात या मोठ्या ८५ टक्के लोकसंख्येची राजकीय सामाजिक स्थिती काय असेल?. याविषयी या ओबीसी एससी एसटी अल्पसंख्याक यांनी पुढे येऊन आपली भूमिका मांडली?.तरच भारताच्या विषमतेचे सत्य जगासमोर येईल.मी आगरी जातीत जन्मलो आहे.रायगड जिल्ह्यातील चिंचोटी अलिबाग हे माझे गाव आहे.माझ्या गावात खोती सावकारी होती.आजही माझा संघर्ष कुळ कायध्याने जमिनी माझ्या आगरी जातीच्या नावाने करण्याचा आहे.जे शेतीचे सत्य आहे. ते गावठाणांचे सत्य आहे.उच्च जाती आमचे ओबीसींचे शोषण करतात.माझ्या वयाची पन्नास वर्षे उलटली आहेत.जमीन मालकीचा हा संघर्ष मी पूर्ण कोकण आणि मुंबई मध्ये पहात आहे.अर्थात रोज मला कुणाचेही तत्काल बोलावणे असते.कुणाच्या जमिनीवर, कुणाच्या घरावर सिडको,महानगर पालिका लोढा किंवा अन्य खाजगी बिल्डर पोलिस घेऊन जबरदस्तीने कारवाई करीत असतात.हिंदूंच्या देशात आम्हा आगरी कोळी कराडी ओबीसी “शूद्र” हिंदूंवर ही जमीन लुटीची कारवाई सुरू असताना ,कोणताही उच्च अथवा शूद्र हिंदू त्यावर आपली न्यायाची प्रतिक्रिया देत नाही.
    माझ्या गावात तर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची शाखा माझ्या आजोबांच्या पिढीपासून आहे.इथले लोक बालवाडीत जाण्याअगोदर संघाच्या शाखेत जातात.मग त्यांच्या जमिनीवर,घरावर या आगरी हिंदू शूद्र ओबीसींचे नाव लागावे ही कोणत्याही हिंदुत्ववादी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी उजवे यांना का सुचले नाही?. वयाच्या पस्तीशीत मला आंबेडकरी चळवळीचे लोक भेटले.त्यानंतर मी डॉ बाबासाहेब आबेडकर यांचे जीवन चरित्र वाचले.त्यांनी कोकणातल्या ब्राह्मण, मराठा,वैश्य,जमीनदार खोत सावकार यांच्या विरोधात आगरी कोळी भंडारी कुणबी यांना घेऊन केलेला जमीन हक्कांचा “कुळ कायद्याचा “ऐतिहासिक संघर्ष वाचला.त्यात कुळ म्हणून आम्ही आगरी लढलो होतो.हा संघर्ष माझे चिंचोटी गाव आजही करीत आहे.आम्ही आगरी हिंदूच आहोत.जीवनाचा प्रामाणिक विचार केला तर आगरी कोळी तरुणांनी आपल्या शेत,जमिनी,घरे यांच्या हक्कांचा संघर्ष केला पाहिजे.हिंदू राष्ट्रवादी लोकांना आगरी कोळी ओबीसींना जमीन मालकी द्यावी.असे आजही वाटत नाही.त्यांना असे वाटले? तर कुळ कायदा अस्तित्वात असताना.ते एका घोषणेत ही जमीन मालकी देऊ शकतात.नागपूर मधून राष्ट्रीय स्वयं संघाने अशी घोषणा केली? तर दिल्ली मुंबई आणि स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या महानगर पालिका,जिल्हा परिषदा येथून, आमच्या जमीन हक्कांची शासकीय निर्णयाची तत्काळ अंमल बजावणी होऊ शकते.प्रश्न केवळ ब्राह्मण जमीनदार जातींचा नाही.तर मराठा, वैश्य या उच्चवर्णीय जातींचा आहे.
    हिंदू मध्ये हे पंधरा टक्के उच्चवर्णीय लोक जमिनी,घरे,उद्योग,व्यवसाय शिक्षण,धर्म यात शूद्र ओबीसींना,सुईच्या टोकावर राहील? एवढेही स्थान द्यायला तयार नसतील? तर अखंड हिंदुस्थानात आगरी कोळी ओबीसींचे स्थान कोणते? किती? हा प्रश्न मला नेहमीच पडतो.आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या कोकणातल्या ओबीसी लोकांची लढाई लढणाऱ्या नेतृत्वात छत्रपती शिवराय महात्मा जोतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आगरी नेते नारायण नागू पाटील,भंडारी नेते सी के बोले.ॲड दत्ता पाटील.लोकनेते दि बा पाटील ही नावे मला दिसतात.
  हिंदुत्ववादी डॉ.हेडगेवार,गोळवलकर,सावरकर,बाळासाहेब ठाकरे मनोहर जोशी किंवा कोणताही मराठा नेता दिसत नाही.अर्थात उच्चवर्णीय नेतृत्व हे आपल्या जमीनदारी साठी जागृत आहे.मग आम्ही भूमिहीन शेतमजूर कुळे यांनी आमचा जमीन घरे गावठाण यांचा संघर्ष करणे.हे आमचे राष्ट्रीय  कर्तव्य ठरते.हिंदुराष्ट्र हा विचार उच्च जातींचे जमीन-जमीनदारी चे संघटन असेल? तर आमच्या जमिनी आमची गावठाणे आमच्या नावे होण्यासाठी जीवघेणा संघर्ष परक्या लोकांविरोधात नाही.तर तो उच्च जातींचे हिंदू जमीनदार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात आहे.सिडको या सरकारी संस्थेने आम्हा आगरी कोळी कराडी ओबीसींना नव्याने “भूमिहीन” केले आहे.याविरोधात लढा उभारणाऱ्या दि बा पाटील यांना ना आम्ही आगरी कोळ्यांनी ओळखले? ना ओबीसी एससी एसटी लोकांनी ओळखले.त्यांच्या नावाचा आग्रह नवी मुंबई विमानतळ पनवेल उरण येथे सुरू आहे.हिंदुराष्ट्रात त्यांचे नाव कोणत्या रस्त्याला,बंदराला विमानतळाला लागेल असे कोणताही ब्राह्मण मराठा अदानी अंबानी बोलणार नाही.ही सत्य राजकीय धार्मिक सामाजिक विषमतेची स्थिती या लेखाने तुम्ही जाणली असेल.? आपण ओबीसी एससी एसटी जे जमीन हक्क,गावठाण हक्क यांच्यासाठी लढतो. तेव्हा आपले घर अंगण गाव येथे डॉ.बाबासाहेब आबेडकर,दि बा पाटील यांच्या प्रतिमा लाऊन त्यांच्या विचारांचे स्मरण करू शकतो का?
   मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण महाराष्ट्र आणि देशात जो हिंदुराष्ट्राचा विचार मांडला जातोय.त्यात आदिवासी एससी ओबीसी अल्पसंख्याक यांच्या जमीन मालकीचा विचार मला दिसला नाही.कुळ कायद्याचे आंदोलन ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चरी शेतकरी संप (अलिबाग रायगड) १९३२ सालात लढाऊ आरमारी आगरी कोळी भंडारी लोकांना घेऊन केला.त्यात यशस्वी होऊन,कुळ कायदा केला.त्यात आमची घरे गावठाणे यांचे हक्क अधिकार देऊन आम्हास “सविधानिक राष्ट्रवाद” दिला.तो हिंदुराष्ट्राला खरा पर्याय आहे.घरे गावठाणे यासाठी लढणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या गरीब कार्यकर्त्याला लढण्यासाठी गरज आहे. तुमच्या प्रत्यक्ष सहभाग आणि आर्थिक ,राजकीय सामाजिक सहकार्याची.पत्रकार बांधवांनी उच्चवर्णीय हिंदुत्व वादी लोकांच्या दादागिरीला न घाबरता याला प्रसिद्धी द्यावी.ही नम्र विनंती करतो.आमच्या घरे,गावठाणे जंगल समुद्र शिक्षण आरक्षण यांच्या हक्कांचा हा लढा संपू देऊ नका.माझ्यासाठी तरी हीच मोक्ष, हीच मुक्ती आहे.
जय आई एकवीरा, जय भीम. जय ओबीसी. जय संविधान.

राजाराम पाटील.८२८६०३१४६४ 
उरण जिल्हा – रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *