राजुरा येथील शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर ९३ विद्यार्थ्यांना दिलासा

राजुरा,२६ एप्रिल कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वृक्षप्रेमी भास्कर करमरकर, तालुका उपाध्यक्ष,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,शाखा राजुरा यांच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आज महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,राजुरा येथे पार पडली.यावेळी इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ४६ अंश सेल्सिअस तापमान असताना विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये,यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. या परीक्षा केंद्रावर एकूण ९३ विद्यार्थी परीक्षा देत होते.भर उन्हात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
स्थानिक स्तरावर अशा प्रकारची मदत मिळाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान अशा उष्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समाजातील इतर घटकांनीही पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

किशोर पाडले 95278 27842, राजुरा,यांस कडून
